मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

बुधवार, २५ मे, २०१६

एकोणतीस सक !!



लहानपणीची गोष्ट! सहावीत असताना शाळेत एका सरांनी वर्गात आम्हां मुलांना आव्हान दिलं, सर्वांसमोर येऊन २९ चा पाढा बोलुन दाखविण्याचं! मी ते स्वीकारलं का सरांनी ते मला स्वीकारायला भाग पाडलं हे आठवत नाही पण मी समोर आलो आणि २९ चा पाढा सुरु केला. २९ सक १७४ आणि २९ साता २०३ मध्ये कोठेतरी गडबडलो. गानू सर होते ते! त्यामुळे हातावर छडीचा प्रसाद घेऊन जागेवर परतण्याशिवाय पर्याय नव्हता.

नंतर कधीतरी मग लक्षात आलं. २९ चा पाढा थेट लक्षात ठेवायची गरज नाही. ३० चा पाढा संदर्भ ठेऊन आपल्याला २९ चा पाढा पटकन मिळविता येतो. थोडं पटापट मनातल्या मनात वजाबाकी करता आली पाहिजे इतकंच! २९ सक म्हटल्यावर ३० सक १८० दिसायला हवेत आणि त्यात ६ वजा करुन १७४ हे उत्तर मिळवता यायला हवं.

आयुष्य मग हळुहळू क्लिष्ट होत गेलं! २९ च्या पाढ्यापेक्षा नक्कीच जास्त क्लिष्ट! मग जाणवलं की २९ च्या पाढ्याचं तंत्र आयुष्यात बऱ्याच ठिकाणी उपयोगी पडू शकतं. चर्चगेटवरुन कांदिवलीला जायचं असेल तर प्रत्येक वेळी बोरिवली स्लो गाडी पकडायचीच गरज नाही. कमी गर्दीच्या वेळी विरार जलद पकडुन बोरीवलीला येऊन मग मागं कांदिवलीला येऊ शकतो. ह्यात कमी गर्दीची वेळ कोणती ह्याचा निर्णय घेता यायला हवा. ह्या महिन्याच्या आरंभी मालवणहून ५१२ किमी टुकार रस्त्याने कुच करताना नाकी नऊ आले तेव्हाही जाणवलं की गोव्याला विमानाला जाणं आणि मग कमी अंतर रस्त्याने कूच करणं केव्हाही चांगलं झालं असतं!

आपल्या माणसांच्या नात्यांचं सुद्धा असंच काहीसं असतं नाही का! ह्या एकोणतीसच्या पाढ्याच्या विविध छटा आपणास अनुभवायला मिळतात ! 

१) आपण २९ च्या पाढ्यासारखी क्लिष्ट आकडेवारी पदोपदी छोट्या मोठ्या घटनांमध्ये करत राहतो. मागच्या एखाद्या प्रसंगात नक्की योग्य काय झालं असतं ह्याचाच काथ्याकुट करत बसतो. म्हणजे २९ सक १७६ कि १७४ ह्याचाच विचार करत असतो. आणि समोरच्या व्यक्तीला आपण प्रतिसादच देत नाही. खरंतर समोरच्याला १७० - १८० च्या मधलं कोणतंही उत्तर चाललं असतं कारण त्याला महत्व असतं ते आपल्या प्रतिसादाचे! पण आपण मात्र अचुकतेच्या नादापायी तो क्षण गमावुन बसतो! होतं काय की कालांतराने आपणास जरी त्या घटनेतील योग्य अयोग्यतेची जाणीव झाली आणि १७४ उत्तर मिळालं तरी समोरचा माणुस त्याचा २९ चा पाढा घेऊन फार पुढे गेलेला असतो. 

२)आयुष्य खुप गतिमान होत चाललं आहे. काही लोकांनी मनापासुन हे स्वीकारलं आहे आणि ते आपल्या वाढत्या जबाबदाऱ्या आणि आप्तजन, मित्रमंडळी ह्यांच्याशी संपर्क साधुन असतात. अगदी परिपुर्ण नसला तरी सर्वांना वरवर खुश ठेवण्याइतका ! 

पूर्वी आयुष्य तुलनेने संथ होतं. मोजकी नाती आणि मित्रमंडळी होती. आणि वेळही होता त्यामुळे इच्छा असेल तर हे वैयक्तिक ऋणानुबंध परिपूर्णतेने जपता यायचे. ह्या काळातील काही मंडळी ह्या बदललेल्या युगात अजुनही अस्तित्वात आहेत. आणि वर उल्लेखलेल्या मंडळीशी संवाद साधताना त्यांना ही मंडळी काहीशी ढोंगी असल्याचा भास होतो ! पण लक्षात ठेवा दोन्ही विचारधारणा आपापल्या परीने योग्य आहेत!

मंडळी वरील म्हणणं पटलं अथवा न पटलं तरी बोला !
एकोणतीस सक …. !!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...