मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

बुधवार, २४ फेब्रुवारी, २०१६

सरस्वती विद्या मंदिर १९xx बॅच

स्थळ - मुंबई २०६५ 

संदर्भ - विनय मांडे (वर्षे ९०) दैनंदिनी 

आज पहाटे थोडी लवकरच जाग आली. रात्रभर तशी बेचैनीत गेली. अखिलची तब्येत अगदी नाजुक बनली होती. कधी वाईट बातमी येईल ह्याचा भरवसा नव्हता. अखिल आणि सर्व शालेय मित्रांच्या आठवणी डोळ्यासमोरून अगदी झरझर सरकत राहिल्या. 

अखिल माझा बालपणीचा शालेय मित्र! लहानपणी मराठी माध्यमाच्या शाळेत अगदी धमाल दिवस घालविले. सरस्वती विद्या मंदिरची आमची बॅच तशी हुशार म्हणून गणली गेलेली. शालेय जीवनातील आठवणी अगदी हृदयाशी जपुन ठेवल्या. शालेय जीवनानंतर आम्ही सर्व दुरावले गेलो. मधली काही वर्षे फारसे एकमेकांच्या संपर्कात नव्हतो. मग २०१० च्या सुमारास फेसबुक, whatsapp ने आम्हांला एकत्र आणले ते कायमचे! 

whatsapp चा आमचा 'सरस्वती विद्या मंदिर १९xx बॅच ' ग्रुप म्हणजे एक धमाल कट्टा बनला. शालेय जीवनातील आठवणी, प्रत्येकाच्या जीवनातील सुखदुःखाचे क्षण सर्वांसोबत शेयर करण्याचे हे साधन बनले. आम्ही असे जवळ आलो की कधी दूर गेलोच नव्हतो. 

वर्षे पुढे सरकत गेली. केंद्रबिंदू आमच्यावरून आमच्या मुलांच्या जीवनाकडे वळला. मुलांच्या दहावी, बारावी, पदवी परीक्षामधील यशांचे आम्ही कोडकौतुक केले. हे करताना मग हळुहळू ह्या नवीन पिढीच्या लग्नाच्या निमित्ताने आमच्या भेटी होऊ लागल्या. कोणाच्या गुडघेदुखीचे, सांधेदुखीचे अपडेट 'सरस्वती विद्या मंदिर १९xx बॅच' वर येऊ लागले. ह्यासाठी नवनवीन चिन्हांचा वापर वाढू लागला. वेगवेगळ्या जोक्सचे प्रमाण हळुहळू कमी होत गेले. जीवनातील अखिल आनंदाचा झरा वाहता ठेवणे फार कमी जणांना जमत राहिलं. ग्रुपवर अभंगाचे प्रमाण वाढत गेले. 

२०४० चे दशक मात्र सुरुवातीलाच दुःखी बातम्या घेऊन आले. आजारपणात आमचे दोन सवंगडी स्वर्गवासी झाले. मग ग्रुप अगदी हबकून गेला. जीवनाचे अंतिम सत्य सर्वांना अगदी अंतर्मुख करून गेले. वर्षे काळाच्या पडद्यामागे जात राहिली आणि त्यांच्यासोबत आमचे साथीदारही! गेल्या वर्षी कादंबरी गेली आणि मग मी आणि फक्त अखिलच राहिलो ह्या ग्रुपवर. काहींचे नंबर तसेच ग्रुपवर राहिले होते. 

मला अखिल हवा आहे! माझ्या बालपणाशी जोडणारा एकमेव दुवा अखिल; त्याची तब्येत सुधारावी अशी खुप खूप इच्छा! पण गेले दोन दिवस त्याचा काही पत्ता नाही. last seen चार दिवसांपूर्वीचे! 

बिनसाखरेचा चहा घेता घेता नवीन मेसेज whatsapp वर आला. धीर होत नव्हता तरी पाहिलं - मेसेज अखिलच्या मुलाकडून आला होता. तो उघडून पाहायची गरज नव्हती. 

आताशा मला खूप खूप एकट वाटतंय! 'सरस्वती विद्या मंदिर १९xx बॅच' चा ग्रुप उघडून पाहायची इच्छा सुद्धा होत नाही! हा ग्रुप कधीपर्यंत अस्तित्वात राहील कोण जाणे! अधुनमधून बालवाडीचा पहिला दिवस डोळ्यासमोर सरकत राहतो इतकं मात्र खरं! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भटकंतीचा महिना !

२६ जानेवारी ते २४ फेब्रुवारी ह्या २९ दिवसांत चांगलीच भटकंती झाली. त्यातील बहुतांशी प्रवास कामानिमित्त आणि एक जवळचा प्रवास शालेय स्नेहसंमेलना...