मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

मंगळवार, २६ जानेवारी, २०१६

स्नेहसंमेलन गाथा !!

१९८८ साली दहावी उत्तीर्ण झालेली आमची न्यु इंग्लिश स्कुलची बॅच! २००८ साली विशाल पाटीलच्या अथक प्रयत्नाने आम्ही पुन्हा एकदा एकत्र जमलो. थोडथोडके नव्हे तर जवळपास ६५ - ७०! त्यामुळे उत्साहित होत आम्ही दरवर्षी २६ जानेवारी रोजी भेटण्याचं आम्ही निश्चित केलं. 

२००९ साली आम्ही आमच्या आवडत्या शिक्षकांचा गौरव करण्याचं आम्ही ठरविलं. त्यावेळी साधारणतः आम्ही ४० -४५ आणि जवळपास ४० गुरुजन ह्यांच्या सोबतीनं एक हृदयस्पर्शी सोहळा झाला. 

का कोणास ठाऊक, पण २०१० सालापासुन मात्र स्नेहसंमेलनास हजर राहणाऱ्या आमच्या सहविद्यार्थ्यांच्या संख्येत कमालीची घट होत गेली. आणि सध्या ही संख्या साधारणतः वीसच्या आसपास स्थिरावली आहे.  आज २६ जानेवारी २०१६. आमच्या बॅचचे २६ किंवा २५ जानेवारीस होणारं सलग ९ वे स्नेहसंमेलन! बाजुच्याच वर्गात १९८३ बॅचने सुद्धा आज स्नेहसंमेलन आयोजित केलं होतं. तिथं जवळपास ७० जण उपस्थित होते आणि वर्ग अगदी गजबजून गेला होता. 

गप्पांच्या ओघात विषय निघाला २००८ ते २०१६ एक आढावा! जवळपास वीस वर्षांनी उत्साहाने एकत्र आलेली मंडळी पुन्हा का दुरावली? त्यातील चर्चेतील काही मुद्दे आणि काही माझे विचार!

१> आमच्या बॅचने दरवर्षी केवळ शाळेतच भेटण्याचा निर्णय घेतला होता. केवळ गेल्या वर्षी एक बदल म्हणून तो मोडला गेला. पण दरवर्षी ह्या एकाच मार्गाने भेटण्यात बहुदा काही मंडळींना रस नसावा अशी शक्यता आता वाटू लागली आहे. 

२> आज स्नेहसंमेलनाच्या दरम्यान आमच्या सर्वांचे आवडते भिडे सर आले. त्यांना मुख्याध्यापकांच्या प्रशिक्षण शिबिरात जायचं असल्याने ते अगदी घाईत होते पण तरीही त्यांनी आमच्यासाठी काही मिनिटे वेळ काढला. बोलता बोलता त्यांनी एक लाखमोलाचा सल्ला दिला. तुम्ही इतक्या नित्यनेमानं एकत्र येता तर मग काहीतरी विधायक कार्यात गुंतवून घ्या. ह्या बाबतीत त्यांचं उदाहरण आदर्श म्हणुन समोर ठेवण्यासारखं आहे. सहकारी बँक, देवालय, शिक्षण संस्था ह्या सर्वात त्यांनी स्वतःला निवृत्तीनंतर गेली बारा वर्षे गुंतवून ठेवलं आहे. गुंतवून ठेवलं आहे म्हणण्यापेक्षा त्यात त्यांनी अत्यंत मोलाचं असं कार्य पार पाडलं आहे. 

३> विधायक कार्याचं म्हणाल तर आमच्या बॅचने तशी सुरुवात केली होती ती शाळेसाठी निधी गोळा करून. पण शाळेच्या ज्या इमारतीसाठी हा निधी गोळा केला त्या इमारतीला वापरात येण्यासाठी उशीर झाल्यानं हा निधी काही वर्षं पडून राहिला. आणि त्यामुळं काहीजण दुखावले गेले. मग शेवटी न्यू इंग्लिश स्कुल माजी विद्यार्थी महासंघ आमच्या मदतीस धावून आला. प्राथमिक शाळेच्या वर्गाचे नुतनीकरण, शाळेसाठी संगणक अशा विधायक कार्यासाठी हा निधी वापरण्याची त्यांनी आम्हांला संधी उपलब्ध करुन दिली. पण काहीजण जे मुख्य प्रवाहातून बाजूला झाले ते कायमचेच! 
ह्यात एक बाब लक्षात घेण्याजोगी! जवळच्या मित्रांत, नातेवाईकांमध्ये समजा काही कारणास्तव गैरसमज झाला तर तो उघडपणे त्या व्यक्तीसमोर बोलुन दाखवून त्या गैरसमजाचा चर्चेने सामंजस्यपणे तोडगा काढण्याच्या पद्धतीचा आपल्या समाजात बहुतांशी अभावच दिसतो. 

४> मध्यंतरी लोकसत्तेत लेख वाचला होता. ह्या स्नेहसंमेलनात मोठ्या उत्साहाने हजेरी लावलेल्या पण नंतर पुन्हा इतक्या वर्षानंतरसुद्धा पुन्हा त्याच मुलांनी सर्व घडामोडींचा ताबा घेतल्याने नाराज झालेल्या एका माजी विद्यार्थ्याचे ते मनोगत होते. बहुतांशी माजी विद्यार्थ्यांसाठी ह्या आठवणी रम्य असतात पण त्यातील काहीसा नावडता भाग जर प्रामुख्याने पुन्हा एकदा समोर येणार असेल तर मात्र लोकांना अशा प्रसंगापासून दूरच राहावंस वाटू शकतं. कमी झालेल्या उपस्थितीमागे हे असले काही कारण असू शकेल का?

सर्व घडामोडींचा ताबा घ्यायची कोणाची इच्छा असल्यास त्याने स्वतःहून पुढे यावं ही विनंती!

५> हल्ली सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावाने प्रत्यक्ष भेटणं किंवा फोनवर बोलणं सुद्धा कमी झालं आहे. त्यामुळे २००८ साली प्रत्यक्ष घरी जाऊन केली गेलेली आमंत्रण आता whatsapp वरील मेसेजवरून होतात किंवा फेसबुकाच्या एका इवेंटवर भागविली जातात. दुसऱ्यांना आमंत्रण करताना स्वीकारार्ह असलेली पद्धती आपल्याला आमंत्रण करताना मात्र बहुदा आपल्याला पसंत नसते. 

६> शालेय जीवनात साधी असणारी सर्वांची आयुष्य कायमची तशी राहत नाहीत. काहींच्या वैयक्तिक आयुष्यात खूप व्यग्रता येऊ शकते किंवा त्यांना अनेक अडी अडचणींचा मुकाबला करावा लागत असू शकतो. त्यामुळे शाळेच्या स्नेहसंमेलनाला हजर राहणे हे नक्कीच त्यांच्या प्राधान्य क्रमात नसणार! कदाचित मनात दाट इच्छा असुन देखील!

> अजुन एक मुद्दा! आपण शालेय जीवनानंतर अनेक मित्र जोडतो. कलेची, एखाद्या खेळाची, वाचनाची आवड, किंवा एखादा छंद आपणा सर्वांना एकत्र जोडतो. ह्या मित्रांना आपण बऱ्याच वेळा भेटत असतो तो ह्या एका बंधाच्या ओढीने! पण कधीकधी शालेय मित्रांना एकत्र जोडणारा बंध केवळ बालपणातील शाळेच्या आठवणी इतकाच राहतो आणि त्यामुळे  ही वार्षिक भेट  प्राधान्यक्रमात मागे ढकलली जाते

आज चर्चेअंती काही बदल करून पाहण्याचा निर्णय आम्ही घेतला. केळव्याला सहकुटुंब सहल हा त्यातला एक निर्णय! जे वर्गमित्र काही वर्षे पुन्हा दुरावले आहेत त्यांना पुन्हा संपर्कात ठेवण्याचा निर्धार काहींनी व्यक्त केला. 

आशावादी अशा ह्या मित्रांना भेटून नक्कीच बरं वाटलं. समस्या कोणाला चुकल्या नाहीत की कोणालाही आयुष्य परिपुर्ण बनवता आलं नाही, पण सद्यस्थितीत सुधारणा करण्याची इच्छा बाळगणाऱ्या आणि सतत प्रयत्नशील राहणाऱ्या आपल्या बालमित्रांच्या संगतीत वर्षातील काही तास व्यतीत करणं केव्हाही उचित आहे! 

इति स्नेह संमेलन गाथायाम नव अध्यायम संपूर्णम!!

२ टिप्पण्या:

  1. आपले मंथन योग्यच आहे. परंतु बरीच मंडळी आत्मकेंद्रित असतात. सुरवातीला मीही फार सोशल आहे हे दाखविण्यासाठी ती मंडळी अशा उपक्रमात सहभागी होतात. पण लवकरच त्यातून दुर होतात. आपण सहकुटुंब एकत्र येण्याचे ठरविले आहे. पण त्यातून फारसे काही साध्या होईल असे वाटत नाही. परिचय होईल पण मने जुळतीलच असे नाही.

    उत्तर द्याहटवा
  2. most of our students not staying in vasai.they have moved out of vasai and to travel in virar train is a harculas task.may be that is one of the reason.but i think if there is a will there is a way.

    उत्तर द्याहटवा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...