मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, २६ डिसेंबर, २०१५

वारसदार - अंतिम भाग

नीलाने आमदारकीच्या कामात मोठा रस घेतला होता. पक्षश्रेष्ठींना सुद्धा पक्षाच्या प्रतिमेसाठी असा नवीन तरुण चेहरा उपयोगी पडत असल्याचं जाणवत होतं. आणि त्यामुळे काहीशा कमी महत्वाच्या उपक्रमात नीलाला सरकारचं प्रतिनिधित्व करायला मिळत होतं. असाच एक परिसंवाद होता "भारत आणि पूर्वकालीन मध्य पूर्व सोविएट रशियातील संघराज्य - शैक्षणिक संबंध". नीलाने बरीच खटपट करून माहिती गोळा केली आणि हा परिसंवाद गाजवला. तिला एकंदरीत खूपच बरं वाटलं. 

कुलकर्णीनी आपलं मित्तल संशोधन अभियान मोठ्या जोरात चालूच ठेवलं होतं. ह्यात पुरावे तसे मिळत होते पण असल्या पुराव्यांविरुद्ध वर्षोनुवर्षे खटले चालू ठेवण्याची क्षमता मित्तल बाळगून असणार ह्याच्याविषयी कुलकर्णी आणि राव ह्यांच्यात एकमत होतं. त्यामुळे त्यांना शोध होता एखाद्या अगदी ठोस पुराव्याचा! गेले काही दिवस हे दोघं रावांच्या घरी बसूनच उपलब्ध कागदपत्रांचा अगदी बारकाईने तपास घेत होते. सुशांतदेखील सध्या बंगलोरात असल्याने त्यांना वेळेचं कसलंच बंधन नव्हतं. 

अशीच एक शुक्रवारची रात्र होती. आज कुलकर्ण्यांना दोनच काहीच फाटलेली कागदपत्रं त्यांच्या विश्वासू माणसाने पाठवून दिली होती. दिवसभर वेळ न मिळाल्याने मग ते ती कागदपत्रे तशीच घेऊन रावांकडे आले होते. नेहमीप्रमाणे आदरातिथ्य करून राव कागदपत्रांची पाहणी करण्यास बसले. काही क्षणातच त्यांच्या नजरेत चमक दिसली. "कुलकर्णी बहुदा मासा पक्का सापडला आपल्याला!" त्यातील एका कागदावरील एका नोंदिकडे अंगुलीनिर्देश करून राव म्हणाले. 

पुढील काही दिवस ह्या नोंदीच्या आधारे त्यांनी बराच पुरावा गोळा केला. आता इतक्या भरभक्कम पुराव्यात कसलीच कसर राहिली नाही असे रावांना वाटत असतानाच कुलकर्णीनी एक मुद्दा काढला. "राव, हे कागदपत्र मिळालं असतं तर मित्तलला कोणीच वाचवू शकलं नसतं!" कुलकर्णीचा हा आवेश पाहून राव विचारात पडले. कुलकर्णी जे म्हणत होते ते कागद होतं मंत्रालयातील आणि ते मिळवायचं म्हटलं तर सरळ मार्गाने मिळण्यासारखं नव्हतं. आणि सध्या तर रावांचा मंत्रालयातील प्रवेश बंदच झाला होता. 

सुधीरराव रात्री बिछान्यावर तळमळत होते. गीताबाईंना त्यांचं काहीतरी बिनसलं आहे हे समजत होतं. "काय झालंय तुम्हांला?" शेवटी न राहवून त्यांनी रावांना विचारलं. मग बराच वेळ राव त्यांना आपली कहाणी सांगत बसले. गीताबाईंना ह्यातलं फारसं काही समजत होतं अशातली गोष्ट नाही पण त्या उगीचच मान डोलावत होत्या. शेवटी रावांनी आपलं बोलणं थांबवलं तेव्हा गीताबाई अचानक म्हणाल्या, "आपली नीला तर असेल ना मंत्रालयात, मग तिला आणायला सांगा ना हे कागदपत्र!" रावांच्या डोक्यात हा विचार आला नव्हता हे शक्य नव्हतं पण नीलाला आपल्या सुडाच्या राजकारणात सामील करण्याचा त्यांचा अजिबात इरादा नव्हता आणि त्यामुळेच ते इतके दिवस ही गोष्ट टाळत होते. पण आता गीताबाईच्या बोलण्यानं त्यांच्या विचारचक्राला चालना मिळाली. नीलाला ह्यातलं फारसं काही न सांगता कोणाच्या मध्यस्थीने फक्त ती कागद स्वीकारायला सांगुयात अशा विचाराने त्यांच्या मनात उचल खाल्ली. एकदा का ही कागदपत्रं आपल्या हातात सापडली की मग नीलाला ह्या प्रकरणापासून पूर्णपणे दूर ठेवण्याचा त्यांनी मनोमन निर्धार केला. 

मंत्रालयातील गृहसचिवांच्या कपाटातील ही कागदपत्रे बाहेर काढून त्यांची छापील प्रत काढण्याचे जोखमीचं काम करायला कोण तयार होईल हा मोठा प्रश्न होता. केवळ पैसे देऊन काम करणारे मिळाले असते पण पुढे ही गोष्ट गुप्तसुद्धा ठेवता आली पाहिजे. राव आणि कुलकर्णी ह्यांच्या नजरेसमोर अनेक नाव तरळली पण कोणाविषयी छातीठोकपणे खात्री अशी देताच येईना. शेवटी मग कुलकर्णीनी गृहसचिवांच्या मदतनीसांपैकी एकावर आपलं लक्ष केंद्रित केलं. गृहसचिव एका विशिष्ट वेळी साधारणतः आपल्या कक्षाबाहेर जातात आणि त्यावेळी बऱ्याच वेळा कक्षाला लॉक केलेलं नसतं अशी त्यांना माहिती मिळाली होती. आणि ह्या वेळातच हा मदतनीस ही विशिष्ट क्रमांकाची फाईल बाहेर काढणार होता. 

बऱ्याच दिवसांनी नीलाला जरा फुरसत मिळाली होती. आमदारबाईंनी आपली नवीकोरी गाडी काढून त्या आपल्या आईसोबत खरेदीला बाहेर पडल्या होत्या. गाडी सुशांतच्या घरासमोरून जात होती तेव्हा अचानकपणे विचार येऊन तिने ड्रायव्हरला गाडी थांबावयाला सांगितली.  अचानक ब्रेक मारायला लागल्यामुळे ड्रायव्हर वैतागलाच आणि मॉलच्या बोलीने बाहेर पडायला तयार झालेली आईसुद्धा वैतागली. 

आईचा हा वैताग रावांच्या घरात शिरताना सुद्धा कायम होता. पण मग गीताबाई आणि सुधीररावांच्या अगत्यपूर्ण स्वागताने ती मनोमन खुश झाली. नीलाला आज सुशांतची अगदी खूप आठवण आली होती आणि त्यामुळेच अचानक त्याच्या घरी वळण्याचा तिनं निर्णय घेतला होता. तो तर बंगलोरमध्ये असणार ह्याची तिला माहिती होतीच पण तिचा आणि त्याचा आजकाल थेट संपर्क नव्हता. आमदारकी स्वीकारल्यानंतर उगाच कोणी पराचा कावळा करायला नको म्हणून ती सुशांतशी संपर्क करायचं टाळत होती. 

अगदी पहिल्यांदा भेटत असूनसुद्धा तिच्या आईची आणि गीताबाईची चांगलीच गट्टी जमली. खरेतर चौघंही दिवाणखान्यात बसले होते पण कोणत्या तरी खमंग पदार्थाच्या पाककृतीच्या गप्पा निघाल्या आणि त्या दोघी स्वयंपाकघरात गेल्या. रावांनी हीच संधी साधली आणि अगदी मोजक्या शब्दात आपली योजना नीलेच्या कानी घातली. मंत्रालयातून एक फाईल आणायची आहे इतकंच त्यांनी नीलेला सांगितलं. खरतरं नीला असल्या बाबतीत सावधान असायची पण आज मात्र सुशांतच्या विचारात गर्क असल्याने म्हणा किंवा खुद्द राव ही विनंती करीत असल्याने तिने हे काम करायचं स्वीकारलं. 

जोपर्यंत राव आणि कुलकर्णी हे दोघंच योजना आखीत होते तोवर त्या योजनेच्या गोपनियेतेविषयी शंका घेण्याचे काम नव्हते. पण आता गृहसचिवांचा मदतनीस आला होता. 

आजचा दिवस तसा खुशीतच घालवून नीला घरी परतली होती. उद्या परत मंत्रालयात कामासाठी जायचं होतं. अचानक तिच्या फोनची रिंग वाजली. बंगलोरचा क्रमांक दिसताच मनात निर्माण होणारी तिची सुखद शंका सुशांतच्या आवाजाने खात्रीत परिवर्तित झाली. पुढील तासभर ते दोघं बोलत होते. सुशांत काहीसा बदलल्यासारखा वाटत होता. अगदी मोकळेपणाने बोलत होता. बहुदा कॉर्पोरेट जगात राहून बदलला असेल किंवा दूर राहून त्याला आपलं स्थान कळलं असावं. ह्यातील दुसराच अंदाज खरा असावा अशी आशा नीला करीत होती. 
दुसऱ्या दिवशी दुपारी मित्तल आपल्या कार्यालयात खुशीतच बसला होता. एक मोठं प्रोजेक्ट मंजुरीच्या वाटेवर व्यवस्थित कूच करीत होतं आणि अजून काही शेकडो कोट्यावधी रुपयांची त्याच्या संपत्तीत भर पडणार होती. त्या खुशीत असतानाच त्याच्या फोनची बेल खणखणली. फोनच्या संभाषणाच्या काही मिनिटातच त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. त्याने हे आणि आधीची काही प्रोजेक्ट मिळविण्यासाठी केलेल्या अवैध मार्गाचे पुरावे असलेली फाईल कोणीतरी मंत्रालयाच्या बाहेर काढायचा प्रयत्न करतेय हे फोनवर बोलणारा त्याचा खबऱ्या भाटिया सांगत होता. "फाईल बाहेर गेलेय की जाणारेय!" आपलं डोकं जरा शाबूत ठेऊन मित्तलने विचारलं. " कक्षातून बाहेर पडली आता काही वेळात मंत्रालयातून बाहेर पडतेय!" इतकं सांगून भाटियाने फोन ठेवला. 


मित्तल प्रचंड खवळला होता. आता ह्या प्रकरणाची फाईल बाहेर  पडून जर मीडियाच्या हातात सापडली तर मात्र आयुष्यभर मेहनत करून बनविलेलं साम्राज्य काही क्षणात उद्ध्वस्त होऊ शकलं असतं. ह्या कारस्थानाच्या मागे कोण असावं ह्याची माहिती भाटियाला मिळाली नव्हती. ही फाईल सध्या कोणाकडे आहे हे सुद्धा त्याला माहित नव्हतं. साऱ्या गोष्टी माहित करून मी थोड्या वेळातच फोन करतो असे त्याने मित्तलला सांगितलं होतं. इतक्यात मित्तलच्या डोक्यात एक विचार आला  शांत झाला. ही फाईल बाहेर पडली तर मित्तल सोबत अनेक मोठ्या धेडांचे भवितव्य धोक्यात आलं असतं आणि त्यातील काही माहिती मुख्यमंत्री बळवंतरावांना सुद्धा अडचणीत आणू शकणारी होती. शांतपणे मित्तलने बळवंतरावांचा फोन फिरविला. 

राव आणि कुलकर्णी काहीशा चिंतीत स्थितीत एका सदनिकेत घडामोडींचा आढावा घेत होते. नीलाने फाईल बाहेर काढली की ती वाटेत तिच्याकडून घ्यायची आणि मग तात्काळ वार्ताहर परिषद बोलवायची असा त्यांचा बेत होता. वार्ताहर परिषदेची तयारी सुद्धा कुलकर्णीनी करून ठेवली होती. अचानक दारावर जोरात धक्क्यांचा आवाज आला. "अरे कोण आहे? काही पद्धत वगैरे आहे की नाही!" असे बोलतच कुलकर्णी जागेवरून दरवाजा उघडण्यासाठी उठले. त्यांना दरवाजा उघडण्याची गरजच पडली नव्हती. दरवाजा मोडून पडला होता.

मोडलेली काही हाडं आणि काळेनिळे झालेले डोळे अशा अवस्थेत राव आणि कुलकर्णी ह्यांना त्या बंगल्यात आणलं गेलं होतं. फाईलीचा पुढचा प्रवास कसा चालला आहे हे ओळखण्यात भाटियाला यश मिळालं नव्हतं आणि हे दोघेसुद्धा तोंड उघडायला तयार नव्हते म्हणूनच ह्या जोडगोळीची अशी अवस्था करण्यात आली होती.  

त्या बंगल्यात दोघांना एका अंधाऱ्या खोलीत कोपऱ्यात ढकलून देण्यात आलं होतं. "अजून तोंड उघडलं की नाही!" समोरून एक आवाज आला. राव आता मात्र अगदी घाबरून गेले. इतका अंधार असला आणि इतका मार खाल्ला असला तरी बळवंतरावांचा आवाज ओळखण्याइतपत त्यांचा मेंदू शाबूत होता. आपल्या ह्या योजनेचा बळवंतरावांना फटका बसू शकतो हे आपण कसं ताडलं नाही ह्याचा त्यांना ह्या क्षणी प्रचंड पश्चाताप होत होता. पण आता डोकं शांत ठेवण्याची वेळ होती. मित्तलशी वैर वगैरे संपवून टाकावंच लागणार ह्याचा त्यांनी त्याच क्षणी निर्णय घेतला. परंतु बहुदा उशीर झाला होता. अचानक समोरच्या संगणकाची स्क्रीन उजळली. आणि हातपाय बांधलेला सुशांत त्यांच्या नजरेस पडला.  


"ती फाईल आमदार नीलाकडे आहे" रावांचे हे अंधारातील बोल सुशांतच्या कानी अगदी उकळत्या लोहरसाप्रमाणे पडले. "बाबा बाबा कुठे आहात तुम्ही?" तो अगदी आतुर होऊन म्हणाला. त्याच क्षणी खोलीतले दिवे उजळले. आपल्या बाबांची हालत पाहून सुशांत अगदी कासावीस झाला. इतक्यात अगदी छद्मी हास्य करीत मित्तल खोलीत प्रकटला. "आणि आमदार नीला कोठे आहेत?" "बाबा तिच्याविषयी काही माहिती ह्या द्रुष्ट लोकांना अजिबात सांगू नकात!" सुशांतचे हे बोल त्याच्या पाठीवर पडलेल्या आणखी एका प्रहाराने अर्धवटच राहिले. 

पुढच्या काही मिनिटातच भाटियाने नीलाचा ठावठिकाणा लावला होता. नीलाला ह्या फाईलमध्ये इतके काय महत्वाचे असेल हे माहित नव्हते. त्यामुळे ती तशीच एका कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी पुण्याला निघाली होती. ड्रायव्हर जाधवने एव्हाना कार एक्प्रेस वे वर आणली होती. आणि अचानक त्याच्या फोनची रिंग वाजू लागली. चार पाचदा कट करून त्याने शेवटी वैतागून फोन सायलेंट मोड वर ठेवला. सहजच त्याची नजर बाजूने धावणाऱ्या कारवर गेली आणि त्याच्या हृदयाचा ठोका चुकला. त्यातील एका माणसानं कोणाला कळणार नाही अशा प्रकारे गन नीलावर रोखली होती.  त्याने आपलं सर्व कौशल्य पणाला लावून गाडी अगदी वेगानं पुढे काढली. नीला मात्र मागच्या सीटवर एक पुस्तिका वाचण्यात दंग होती. त्यामुळे तिला ह्या थरारनाट्याचा अजिबात पत्ता नव्हता. 

सुशांतला एव्हाना व्हिडियो कॉल मधून बाजूला करण्यात आलं होतं. "तिला त्या फायलीत काय आहे किंवा हे प्रकरण कशाबद्दल आहे हे अजिबात माहित नाही हो!" राव अगदी कळवळून मित्तलला सांगण्याचा प्रयत्न करीत होते. " आपल्या लोकातील गोष्टी आपसात मिटवावयाच्या ही साधी अक्कल तुम्हांला दाखवता आली नाही. तरी शेवटी तुम्ही आपली माणसं आणि सुशांत तुमचं रक्त! पण त्या पोरीचा काय भरवसा! अगदी पूर्वीपासून तिच्या अंगात बंडखोरी ठासून भरली आहे आणि आता आम्हांला ह्या बाबतीत आम्हांला अजिबात चान्स घ्यायचा नाहीये!" असे म्हणत मित्तलने फोनवर असलेल्या आपल्या माणसाला खुण केली ती पाहून रावांना धसकाच बसला. नीलाविषयी पित्यासम मायेने त्यांचं हृदय भरून आलं आणि धाय मोकलून ते रडू लागले. 

जाधवने मोठ्या शिताफीने कार पुढे आणली खरी पण आता डाव्या बाजूने एका कारने त्याला अगदी धोकादायकरित्या ओवरटेक केलं. नीलाला एव्हाना काहीतरी गडबड होतेय ह्याचा सुगावा लागला होता. "जाधव इतकी जोरात कार का चालवताय? थोडी हळू चा … " नीलाचे हे वाक्य मागून जोरात येणाऱ्या एका ट्रकने तिच्या कारला दिलेल्या धक्क्याने अपूर्णच राहिलं होतं. 

"नव्या उमेदीच्या आमदार नीला ह्यांचं एक्प्रेसवे वरील अपघातात दुःखद निधन!" दुसऱ्या दिवशीच्या सर्व वर्तमानपत्रांची पहिली पाने ह्या बातमीने भरून गेली होती. नीलाच्या आईवडिलांची परिस्थिती वर्णनापलीकडे होती. 

सहा महिन्यानंतर 
"बघा राव तुम्ही इतकी वर्षे राजकारणात काढलीत पण तुम्हांला इतकं हळवं झालेलं कधी पाहिलं नाही. त्या मुलीला विसरा आता आणि सुशांतला म्हणावं ते RBS चे खूळ विसर आणि परत ये!" मित्तल रावांची समजूत घालत होते. 

दोन वर्षांनी 
सुशांत आणि मित्तल ह्यांच्या मुलीचा लग्नसोहळा अगदी थाटामाटात चालू होता. आमदार सुशांतच्या लग्नसोहळ्याला मात्तबर राजकारणी आणि उद्योगपती ह्यांची हजेरी लागली होती. रावांच्या राजकीय कारकिर्दीला आणि मित्तलांच्या उद्योगसाम्राज्याला लाभला होता एक समर्थ वारसदार!!

सुशांत सर्व पाहुण्यांच्या स्वागतात वरकरणी जरी गढला असला तरी त्याच्या नजरेसमोर येत होती ती नीला आणि त्याची पहिली भेट. 

सिग्नलला बाईक थांबवून त्याने क्षणभरासाठी हेल्मेट बाजूला केलं तशी बाजूच्या कारची काच वर झाली. "हॅलो सुशांत!" कारमधून एक मंजुळ आवाज आला.

नीला मला माफ कर! पण मी शांत बसणार नाही. मी तुला न्याय मिळवून देईनच. स्टेजवर आलेल्या बळवंतरावांच्या हातात हात मिळविताना सुशांतच्या मनात हेच विचार घोळत होते. 

(समाप्त)

भाग १
http://patil2011.blogspot.in/2015/08/blog-post_5.html
भाग २
http://patil2011.blogspot.in/2015/08/blog-post_8.html
भाग ३
 http://patil2011.blogspot.in/2015/08/blog-post_9.html
भाग ४
 http://patil2011.blogspot.in/2015/08/blog-post_15.html
भाग ५
 http://patil2011.blogspot.in/2015/08/blog-post.html
भाग ६ 
 http://patil2011.blogspot.in/2015/08/blog-post_29.html
भाग ७
 http://patil2011.blogspot.in/2015/09/blog-post.html
भाग ८
 http://patil2011.blogspot.in/2015/10/blog-post.html




1 टिप्पणी:

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...