मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

सोमवार, २६ ऑक्टोबर, २०१५

शोध स्वः त्वाचा !!

हल्ली चाकोरीबद्ध आयुष्य जगण्याला जनांच्या नजरेतून फारशी किंमत राहिली नाही. जे काही करायचे ते स्वानंदासाठी, स्वतःच्या विकासासाठी. ह्या विकासातून कुटुंबाचा आर्थिक विकास साधला जातो आणि मग कुटुंबातील अन्य सदस्यांचा बाकीचा विकास आपोआप साधला जाईल अशी हल्लीची सर्वमान्य विचारधारणा आहे. मी बराच काळ ह्याला वैचारिक विरोध केला. कालबाह्य म्हणून सतत गणना केली जाऊ लागल्यावर मी माझे मत सार्वजनिकरित्या मांडणे हल्ली सोडून दिले आहे किंवा अगदी कमी केले आहे. 
काल अचानक पाब्लो नेरुदा या नोबेल पारितोषिक विजेत्या जगप्रसिद्ध कवीची एक कविता वाचनात आली. 


तुम्ही प्रवासाला नाही जात,
भटकत नाही.
तुम्ही वाचतच नाही काही,
जगण्याच्या हाका पडतच नाहीत तुमच्या कानावर,
चुकून कधी नाही देत तुम्ही
स्वत:च्याच पाठीवर शाबासकीची थाप.
याचा अर्थ,
तुम्ही मरताय हळूहळू.

स्वत:चं मन मारून, तडजोड करून जगता तुम्ही.
मायेनं कुणी मदत करायला येतं, तर तेही
नाकारता तुम्ही.
याचा अर्थ, तुम्ही मरताय हळूहळू.

सवयीेंचे गुलाम बनता आहात तुम्ही,
रोज त्याच त्या मळक्या वाटेवर चालताय तुम्ही,
चुकून कधी नव्या रस्त्यानं जाऊन पाहत नाही,
चुकून कधी वाट चुकत नाही,
परक्या अनोळखी माणसांना भेटत नाही,
त्यांच्याशी काही बोलत नाही,
अंगावर चढवत नाही, नवेकोरे पूर्वी न
वापरलेले रंग.
याचा अर्थ, तुम्ही मरताय हळूहळू.

छातीत धडधडतच नाही तुमच्या,
तुमचं पॅशन काय हेच आता आठवत नाही तुम्हाला,
भावनांचा अतिरेकी कल्लोळ नाही जाणवत आतल्या आत,
नाही तुटत पोटात,
नाहीच येत पाणी डोळ्यात.
याचा अर्थ, तुम्ही मरताय हळूहळू.

या कामात मन रमत नाही, असं वाटतं;
तरीही तुम्ही चिकटून बसता
त्याच नोकरीला.
नाही पटत ‘त्या’ व्यक्तीशी तरी,
संपलंय प्रेम हे माहितीये तरी,
तुम्ही रेटत बसता ते नातं,
आयुष्य बदलण्याचा धोकाच नको म्हणता,
सोडत नाही चाकोरी,
झपाटून झोकून देत नाही स्वत:च्या
स्वप्नांसाठी स्वत:ला,
तोलूनमापून सुरक्षित जगण्याचे सल्ले झुगारून देत,
एक संधीही देत नाही स्वत:ला,
स्वत:साठी जगण्याची.
आयुष्यच बदलून टाकण्याची.
याचा अर्थ
तुम्ही मरताय...
हळूहळू...

- पाब्लो नेरुदा

प्रथमदर्शी मला ही कविता आवडली. मी अगदी लाईक वगैरे ठोकला. पण पुन्हा वाचली; अजून एकदा वाचली. मग मात्र मी काहीसा अस्वस्थ झालो. ह्यातील बरेचसे मुद्दे मला लागू होतायेत असे मला वाटू लागलं. म्हणजे मी अगदी तोलूनमापून अरसिक वृत्तीने आयुष्य जगतो की काय असे ह्या कवीला म्हणायचं आहे असा समज मी करून घेतला. 

माझा कंपनीतला बॉस नेहमी सांगत असतो. "महत्वाच्या चर्चेच्या वेळी भावनात्मक विचार करणे सोडून द्या! कोणी एखादा मुद्दा आपल्याविरुद्ध मांडला की तो आपल्यावर वैयक्तिक हल्ला आहे असे समजणे सोडून द्या. तरच तुम्ही ह्या जगात टिकू शकाल!" 
हेच तत्व मी इथे अवलंबिण्याचे ठरविले. पहिल्या कडव्यातील काही गोष्टी जसे की भटकणे, वाचणे हे मी मर्यादित प्रमाणात हल्ली मी करतो. पण भारतातील बराच मोठा वर्ग असा आहे की ज्यांना ह्या बाबतीतील आपल्या इच्छा कौटुंबिक जबाबदारीपायी पूर्ण करता येत नाही. अगदी मन मोडून राहावं लागतं. सर्व पाश सोडून ते काही आपल्या मनाच्या इच्छा पूर्ण करू शकत नाहीत काय? त्यांना अडवतो तो आपल्या मागे आपल्या चिमुरड्या बालकांचे कसे होईल ह्याचा विचार! आपली लठ्ठ पगाराची ऑफर / नोकरी सोडून घरी सांसारिक जबाबदारी सांभाळण्यासाठी बसलेल्या गृहिणीच्या मनात काय भावनाकल्लोळ चालला असेल ह्याची आपण कल्पना करू शकतो. 

पुढे एक ओळ भयंकर खटकली. 

नाही पटत ‘त्या’ व्यक्तीशी तरी,
संपलंय प्रेम हे माहितीये तरी,
तुम्ही रेटत बसता ते नातं,



कोण्या एका व्यक्तीशी पटणे वा न पटणे ही काही एकमार्गी प्रक्रिया नव्हे. एका व्यक्तीच्या स्वभावाच्या समजा "क्ष" म्हणजे १५ छटा असतील आणि त्याच्या जीवनसाथीच्या २०! म्हणजे कोणत्याही वेळी एकूण ३०० पैलूच्या जोडीच्या शक्यता त्या संसारात नांदू शकतात. त्यातील काही आनंददायी असतील तर काही दुःखदायी! आपल्या जीवनसाथीचा कोणता पैलू त्या क्षणी सक्रिय आहे आणि त्याची आपला पैलू बदलायची त्या क्षणी क्षमता काय आहे हे जाणून घेऊन गरज पडल्यास त्या क्षणी आनंद निर्माण करणारा आपल्या स्वभावाचा पैलू जागृत करणे म्हणजे संसारातील खरं प्रेम! मोठाल्या कविता, सुंदर भेटी ही सर्व प्रेमाची रूपं महत्वाची आहेतच पण संसारात हा आता वर्णिलेला मुद्दा फार महत्वाचा!

अजून एक मुद्दा! सर्वसामान्य माणसाच्या जीवनातील एक दिवस निर्विघ्न पार पाडण्यासाठी त्या माणसाला किती संघर्ष करावा लागतो ह्या विषयी बोलण्याची आपल्याकडे पद्धत नाही. सकाळी घरच्या जबाबदाऱ्या पार पाडून अत्यंत तणावपूर्वक असा प्रवास करून सामान्य माणूस ऑफिसात पोहोचतो आणि त्यानंतर तिथल्या कामाच्या आणि माणसांच्या बदलत्या रुपाला तोंड देत तो आपले ध्येय पार पाडतो. कर्तुत्ववान, यशस्वी लोकांचे कौतुक करण्याची पद्धत पूर्वापार चालत आली आहे पण सामान्य माणसाच्या संघर्षाला आणि त्यातून त्याने / तिने साध्य केलेल्या छोट्या छोट्या यशाला नगण्य मानण्याची चूक कोणी करू नये. 

आयुष्याच्या एका वळणावर मुलाबाळांच्या जबाबदाऱ्या संपतात किंवा कमी होतात अशा वेळी आपल्याला संधी मिळू शकते स्वः त्वाचा शोध पुन्हा एकदा घ्यायची! आणि त्यावेळी ह्या कवितेतील बोध घ्या! पुन्हा उफाळून उठा! आणि आपल्या इच्छा पुऱ्या करा. आणि पाब्लोला  ठणकावून सांगा "आम्ही हळूहळू मेलो नव्हतो! आम्ही नव्या पिढीच्या जीवनांकुराला जोपासण्यात मग्न होतो!" 

हे सगळे भावना बाजूला ठेवून सुचलेले विचार! काल मात्र भावनांच्या भरात एक उत्तर दिलेच!

चाकोरीबद्ध आयुष्य जगणे ही आमची पहिली पसंद कधीच नव्हती!
पण नेत्रदीपक काही करण्यासाठी जबाबदाऱ्या झुगारून देणे आम्हांला पटले नाही!!! 
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...