मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, ११ ऑक्टोबर, २०१५

सरमिसळ - २०१५ !!

गेल्या वर्षी मी whatsapp वर का नाही अशी पोस्ट लिहिली आणि ह्या वर्षी whatsapp ला सामील झालो. मी आदर्शवादी उरलो नाही की whatsapp ला सामील झालो ह्याचे खास स्पष्टीकरण द्यावे. गेल्या चार पाच महिन्यातील माझ्या संचारानंतर काही जाणवलेल्या गोष्टी.

१) इथे गैरसमज, मानापमान ह्या गोष्टींना खूप वाव आहे. आपल्याच ग्रुप मधला एखादा आपल्या अपडेट्सना मुद्दाम लाईक करत नाही, आपण एखादा महत्त्वाचा अपडेट टाकला की मुद्दाम दुसराच अपडेट टाकून बाकीच्या लोकांचे लक्ष वेधून घेतो वगैरे वगैरे. 

२)मग काही लोक अनवधानाने नाराज होतात. ग्रुप सोडतात, किंवा अचानक आपला सक्रियपणा सोडून निष्क्रिय बनतात. पण इथेही बऱ्याच वेळा लोकांना दुःखद अनुभव येतो. म्हणजे लोकांना काहीतरी फरक जाणवेल आणि मग ते आपल्याला विचारतील, "काय झालं?" असे घडण्याची शक्यता त्यांना वाटत असते. पण बऱ्याच वेळा इतर लोकांना ह्या गोष्टींचा काहीच फरक पडत नाही किंवा असे आपणास वाटण्याची शक्यता असते. पण कित्येकदा लोक खूप कामात गर्क असतात किंवा इतका विचार करण्याची तसदी घेत नाही. अधून मधून मनाला बरे वाटण्यासाठी किंवा स्वतःचे कौतुक करून घेण्यासाठी आपण whatsapp ला सामील झालो आहोत ह्याचे भान ठेवावं. 

३) मला इथे एक गोष्ट खटकली ती म्हणजे ग्रूप मध्ये एखादा निवर्तल्याची बातमी टाकली जाते आणि काही तासातच लोक विनोद वगैरे टाकायला सुरुवात करतात. माझ्या मते त्या दिवसापुरतं तरी लोकांनी थोडं शांत राहायला हरकत नाही. 

४) एक गोष्ट मात्र खरी की सद्यपिढीशी सतत संपर्कात राहायला हे माध्यम उपयोगात पडतं. 

५) इथे विविध गटात आपल्याला खूप आदर्शवादी विचार ऐकायला मिळतात. लोक त्यांना लाईक वगैरे करतात. मी ह्या बाबतीत मात्र फारसा उत्साही नसतो. हे आदर्शवादी विचार वाचायला वगैरे ठीक असतात पण ते जीवनाचा संघर्षाची उत्तरे अगदी सोप्या तत्त्वात सांगण्याचा प्रयत्न करतात. 

६) आयुष्य इतकं सोपं अजिबात राहिलं नाही. सतत बदल घडवून आणण्याचा मनुष्याचा हव्यास त्याच्या मानसिक स्वास्थाच्या मुळाशी येणार आहे. अभियांत्रिकी शाखेनंतर माहिती आणि तंत्रज्ञान, व्यवस्थापन ही भारतात मोठ्या पगाराच्या नोकऱ्या देणारी क्षेत्रे. पण इथे शाश्वतता क्षणभंगुर असते. आपण ज्या कंपनीत काम करतो तिथलं व्यवस्थापन, त्यांची धोरणे, आपल्या कामाचं स्वरूप, आपले सहकारी ह्यांचं एक चित्र आपल्याला मनातल्या मनात रेखाटून ठेवावं लागतं आणि त्यानुसार आपली धोरणं आखावी लागतात. प्रत्येक दिवसअखेर ह्या चित्रात काय बदल झालेत आणि त्यामुळे आपल्या धोरणात काय बदल घडून आणावेत ह्याचा विचार करावा लागतो. ज्या क्षेत्रात स्थैर्य आहे अशाही क्षेत्रात आपण लोकांचे आयुष्य किती त्रासदायक करता येईल ह्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो. अभियांत्रिकी शाखेत शिकविणाऱ्या शिक्षकांनी डॉक्टरेट केल्याशिवाय त्यांचा पुढील वेतनश्रेणीसाठी विचार केला जाणार नाही ही ह्यातीलच एक बाब! जणू काही ह्या शिक्षकांच्या शिकविण्याच्या दर्ज्यावर त्यांच्या डॉक्टरेटचा मोठा परिणाम होणार आहे. 

७) दुसऱ्या मुद्यात म्हटल्याप्रमाणे लोक फारसा विचार करण्याची तसदी घेत नाहीत. पण हे पूर्ण विधान नाही. लोक दुसऱ्यांच्या बाबतीत फारसा विचार करण्याची तसदी घेत नाहीत. पण स्वतःच्या बाबतीत मात्र ते अगदी जागरूक असतात. सोशल मीडियात दुसऱ्यांच्या बाबतीत फारसा विचार न करण्याची वृत्ती ज्या वेळी प्रत्यक्ष जीवनात डोकावू पाहते त्यावेळी मात्र गंभीर परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे आपला सामाजिक जीवनातील प्रत्यक्ष सहभाग कायम ठेवणे आवश्यक आहे. 

आता काही दुसऱ्या विषयांकडे! गेल्या आठवड्यात दगडी चाळ चित्रपट पाहिला. चित्रपट चांगला आहे. कथा काल्पनिक आहे. अंकुश चौधरीचा चित्रपटातील वावर अगदी सहजरीत्या आहे. पूजा सावंत दिसलीय सुरेख आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे तिचा अभिनय अगदी सहजसुंदर वाटतो!  मकरंद देशपांडे अगदी अरुण गवळीसारखाच दिसतो. पण गंभीरता राखण्याचा नियम पाळताना अभिनयाच्या बाकी छटा दाखवायला फारसा वाव मिळाला नाही असं मला वाटून गेलं. 
ह्या चित्रपटातील मला वाटलेली मुख्य त्रूट म्हणजे हाणामारीचे प्रसंग फारसे वास्तववादी झालेच नाहीत. अगदी सुरुवातीला मामा आमदारावर हल्ला करतो तो प्रसंग किंवा लग्नाच्या वरातीचा खोटा बहाणा निर्माण करून एका मोठ्या असामीस पोलीस संरक्षणातून बाहेर काढतो हे न खुललेले प्रसंग! मराठी चित्रपटांची संख्या झपाट्याने वाढतेय पण कथा, चित्रीकरणावर घेतली जाणारी मेहनत किंवा वेळ आणि बजेट ह्यांचे गणित अजूनही फारसं जमताना दिसत नाही. हा चित्रपट मी वसईला ३ ऑक्टोबरला म्हणजे प्रदर्शित झाल्याच्या दुसऱ्या दिवशी पाहिला. चित्रपटगृहात अवघे २० - २५ लोक होते. वसई म्हणजे चित्रपटाची लोकप्रियता आजमावून पाहण्यासाठी योग्य उदाहरण नसले तरी पण हे चित्र योग्य नाही. 

नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे ह्यांच्या उपक्रमाला दाद द्यावी तितकी कमी! ह्यावर बरेच लेख वाचनात आले. दरवर्षी पडणाऱ्या पावसावर एकाच प्रकारचे पिक घेण्याची मनोवृत्ती सोडावी हा एक महत्त्वाचा विचार त्यातून समजला. मुख्य म्हणजे आपण आत्महत्या करून आपल्या मागे राहणाऱ्या कुटुंबियांची स्थिती काहीच सुधारत नाही आहोत ह्याच भान ह्या शेतकऱ्यांनी राखायला हवं. मुख्य म्हणजे ह्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा प्रयत्न करावयास हवा. प्रत्येक गावात पाणी साठविण्याची छोटी तळी वगैरे निर्माण करायला हवीत. अण्णा हजारे ह्यांनी राळेगणसिद्धीचा असाच पाणी साठवणुकीची व्यवस्था करून कायापालट केला होता असे मागे वाचनात आले होते. त्याचे अनुकरण करता येईल काय ह्याचा विचार करायला हवा. मुख्य म्हणजे राजकारणी लोकांना कायमस्वरुपात हा प्रश्न सोडविण्यात स्वारस्य नसणार हे सर्वांनी समजून घ्यायला हवे. त्यामुळे स्थानिक / गावपातळीवर एखादा तरुण नेता निवडावा आणि त्याचे म्हणणे सर्वांनी ऐकून गावात मोठे वृक्ष लागवड करावेत. सुबाभूळ हे असेच कमी पाण्यावर वाढणारे आणि जनावरांना चाऱ्यासाठी उपयोगी पडणारे झाड! त्याची आणि संबंधित वृक्षांची लागवड करता येईल ह्याचा विचार करावा. आपले शेत एखादी कंपनीप्रमाणे चालवावे अशीही पोस्ट वाचली. त्यात सुद्धा मिश्रपिकांचा पर्याय सुचविण्यात आला होता.

विविध विषय मांडले! विषयांची खोली गाठली गेली नाही. पूर्वीच्या काळी बहुतांशी लोक ज्या गोष्टी करायचे त्यात खूप खोलवर जायचे कारण विद्या / ज्ञान ह्यांना पैशात रूपांतरित करायचं दडपण नसायचं. काळ बदलला बहुतांशी लोकांनी विविध कारणांचा बहाणा निर्माण करून स्वतःमागे पैसे कमवायचा सोस लावून घेतला आहे. पण ज्ञान, तत्वनिष्ठता सर्व काही मागे पडत चालले आहे. समाज बदलवू शकत नसलो तरी आपल्या घरी तरी ह्या मूल्यांना टिकविण्याचा आटोकाट प्रयत्न करूयात!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...