मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, ९ ऑगस्ट, २०१५

वारसदार - भाग ३


 

सुशांतसोबत चहा पिऊन कॅंटीनमधून बाहेर पडल्यावर नीलाचे विचारचक्र अगदी जोरात चालू झालं होतं. आर्थिक धोरणावरील चर्चेचा कार्यक्रम तर आता नक्की झाला होता आणि प्रत्येक पक्षाचा प्रवक्ता सुद्धा निवडला होता,अगदी सुधीररावांच्या पार्टीचा सुद्धा! आता अशा परिस्थितीत सुधीररावांची मनधरणी कशी करायची हेच तिला कळेना! त्याच विचारात ती आयोजन समितीच्या मुख्य कार्यालय असलेल्या एका वर्गात शिरली. 

वार्षिक कार्यक्रमांचे अंतिम स्वरूप आता मूर्त स्वरूप घेत होते. प्रोफेसर पंडित एकेक कार्यक्रमातील निमंत्रितांची यादी आपल्या नजरेखालून घालत होते आणि आपल्या सूचना देत होते. नीला मुख्य कार्यालयात प्रवेश करायला आणि आर्थिक धोरणाचा कार्यक्रम चर्चेस यायला गाठ पडली. "सर्वच पक्षांच्या तरुण कार्यकर्त्यांना एका व्यासपीठावर आणून तुम्ही फारच मोठे धाडस करीत आहात! समजा त्यांची चर्चा अगदी तापली आणि हाताबाहेर गेली तर तुम्ही करणार काय? " पंडितांच्या ह्या प्रश्नाला आयोजन समितीकडे उत्तर नव्हते. काही क्षण ते सर्व एकमेकांकडे पाहताच राहिले. "सर आपण एखाद्या जेष्ठ नेत्याकडे सूत्रसंचालनाची जबाबदारी सोपवली तर!" नीलाच्या तोंडून अचानक वाक्य निघून गेलं. पंडितांना ही सूचना खुपच आवडली. "पण असा कोण नेता आहे का आपल्या नजरेसमोर जो इतक्या कमी कालावधीत तयार होईल? आणि हो त्याने आपल्या पक्षाच्या प्रवक्त्याची बाजू न घेता निःपक्षपाती भुमिका घ्यायला हवी!" पंडित सर म्हणाले. ताबडतोब सुधीररावांचे नाव घेण्याची नीलाची इच्छा तिने दाबून धरली. सुशांतचे बाबा राजकारणात आहेत हे इथल्या इतक्या मुलांपैकी कोणाला तरी माहित असणारच आणि त्यापैकी कोणीतरी एखादा बोलेलच असा तिचा कयास मंदारने बरोबर ठरवला. "सर आपल्या सुशांत सरपोतदारचे वडील सुधीरराव आहेत ना! त्यांना बोलवायचं का?" त्याच्या ह्या प्रश्नावर पंडित सर सुरुवातीला फारसे अनुकूल नव्हते. पण काही क्षण विचार केल्यावर दुसऱ्या कोणत्या पर्यायाअभावी त्यांनी ह्या प्रस्तावाला मान्यता दिली. "मग आता सुधीररावांना भेटायला जाणार कोण?" पंडित सरांनी रास्त प्रश्न विचारला."सर मी उद्या सकाळी जाऊ शकते!" ह्या कार्यक्रमात पुढाकार घेतलेल्या नीलाने तात्काळ संधी साधली. तसं म्हटलं तर आर्थिक चर्चेच्या कार्यक्रमात सुरुवातीपासून नीलाचा पुढाकार असल्याने तिच्यावर कोणी जास्त संशय घेतला नाही. 

नीलाच्या एकंदरीत प्रस्तावावर सुधीरराव खूपच खुश झाले. आपल्या पक्षात आपलं जेष्ठत्व दाखवून देण्याची संधी आपसूकपणे त्यांना ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळणार होती. त्यांनी फारशी चौकशी न करता नीलाला होकार देऊन टाकला. गीताताईंनी आणलेला चहा नीला संपवत नाही तोवर कॉलेजात जायला तयार होऊन आलेला सुशांत तिला पाहून अगदी दचकला. पण नीलाने त्याला नजरेनेच आश्वस्त केलं. "येते हं मी!" स्वयंपाकघरात कपबशी विसळून ठेवत नीलाने गीताताईंचा निरोप घेतला. क्षणभर सारं काही विसरून गीताताई तिच्याकडे पाहतच राहिल्या.

सुशांतला नीलाचं हे धाडस फारसं पसंत पडलं नव्हतं. आपल्या मनात नीलाविषयी नक्की भावना काय आहेत हे त्याला एकतर समजत नव्हतं आणि ते समजून घेणं हे सध्या त्याच्या प्राधान्यक्रमात बसत सुध्दा नव्हतं. नीला आपल्याला आवडते हे तो मनोमन समजून चुकला होता. आणि तिने आपल्या वडिलांना आर्थिक चर्चेविषयीच्या कार्यक्रमात सूत्रसंचालनाची जबाबदारी घेण्याची विनंती केली आणि त्यांनी ती मान्य केली हे ज्या क्षणी त्याला कळलं त्यावेळी तिचा आपल्या कुटुंबांशी जवळीक साधण्याचा तर प्रयत्न तर नाही ना अशी शंका त्याच्या मनात निर्माण झाली होती. पण नीलाची गेल्या तीन वर्षातील प्रतिमा, तिचा स्पष्टवक्तेपणा पाहता तिला असं काही करायची गरज भासणार नाही हे तो पक्कं जाणून होता.

महाविद्यालयाचा वार्षिक कार्यक्रम चांगलाच रंगत चालला होता. सर्वच  सांस्कृतिक कार्यक्रम एकापेक्षा एक रंगत होते. बाहेरच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची आता प्रवेशासाठी खूपच मोठी रांग लागायला सुरुवात होऊ लागली होती. आर्थिक धोरणावरील कार्यक्रमाची हवा आता जोरात निर्माण करण्यात आयोजकांना बरंच यश मिळालं होतं. नीलाने गेल्या कित्येक रात्री केवळ दोन तीन तासांच्या झोपेवर काढल्या होत्या. सुधीररावांनी सुद्धा बरीच तयारी केली होती. ह्या कार्यक्रमाचं मीडियामध्ये व्यवस्थित कवरेज मिळवून देण्याची काळजी सुद्धा त्यांनी आधीच घेऊन ठेवली होती. 

गेले कित्येक दिवस सुशांत आणि सुधीरराव कधी एकत्र जेवलेच नव्हते. पण कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी सुशांतला एकटा जेवताना पाहून सुधीररावांनी गीताताईंना त्यांचसुद्धा ताट घेण्याचा आग्रह केला. "कसं चाललंय तुझं कॉलेज?" खुर्चीवर बसता बसता त्यांनी सुशांतला प्रश्न केला. "चाललंय तसं ठीक! सहाव्याचा अभ्यास जोरदार आहे आणि सातव्याला चांगल्या चांगल्या कंपन्या कॅम्पसला येणार तेव्हा आता चांगले मार्क तर मिळवायलाच हवेत!" सुशांत म्हणाला. बाबांचा मूड ठीक असला तर तो ही ठीकच असायचा. स्वतःहून त्याने कधी बाबांशी मतभेद उकरून काढले नव्हते. "तब्येतीची काळजी घे हो, इतका सर्व अभ्यास करताना! शेवटी काय तर हेल्थ इज वेल्थ!" सुधीरराव त्याला म्हणाले. बऱ्याच महिन्यानंतरचा त्या दोघांचा असा सुखसंवाद पाहून गीताताईंच्या डोळ्यात आपसूकच अश्रू आले. पदरानेच त्यांनी ते पुसून टाकले. सुशांतचे जेवण पहिलं आटोपलं. उठता उठता "बाबा उद्याच्या कार्यक्रमासाठी बेस्ट लक!" असं म्हणून आपल्या चेहऱ्यावरील भावुकता बाबांच्या नजरेस पडू नये म्हणून तो तात्काळ किचनच्या दिशेने निघाला. 

आर्थिक धोरणाचा कार्यक्रम अगदी सुरुवातीपासून चांगलाच रंगला. नीलाने सर्व पक्षांच्या प्रतिनिधींची ओळख करून दिली. आणि मग कार्यक्रमाची सूत्रे सुधीररावांकडे सोपवली. जर ही प्रचारसभा असती तर रावांनी हाती आलेला माईक पुढील तासभर हातचा सोडला नसता पण ते कोणत्या ठिकाणी कसे नियोजन करायचं ह्याची मेख चांगलीच जाणून होते. जरी ह्या कार्यक्रमाचा विषय भारताच्या आर्थिक धोरणाशी मर्यादित असला तरी सद्यकाळात जागतिक अर्थव्यवस्थेतील थोडीदेखील चढउतार कशी आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करू शकत असल्याने त्याचे भान राखणं सुद्धा कसं महत्वाचं आहे ह्याचं सुरेख विवेचन त्यांनी केलं. मग प्रत्येक पक्षाचा प्रवक्ता येऊन आपली बाजू मांडू लागला. त्यात रावांच्या पक्षाचा प्रवक्ता सुद्धा होता. सर्वच पक्षांच्या प्रवक्त्यांनी बाजू मांडून झाल्यावर सुधीरराव एकूण चर्चेचा आढावा घेण्यासाठी म्हणून पुन्हा व्यासपीठावर आले. त्यांचे आढावा घेण्याचे काम सुरु असतानाच कॉलेजातील विघ्नसंतोषी मुलांपैकी एक अचानक उठला आणि "इथे सर्व पक्ष जरी सुधारकांचा आव आणत असले तरी जोवर भ्रष्टाचारी लोक सर्व पक्षांत ठासून भरले आहेत तोवर ह्या देशाचे काही भले होणार नाही !" असे अगदी जोरात ओरडला. अगदी दृष्ट लागण्यासारख्या झालेल्या कार्यक्रमाला हे असं गालबोट लागणं म्हणजे अगदी दुर्देवी घटना होती. सुधीररावांचा चेहरा रागाने अगदी लालेलाल झाला होता. नीलाच्या ध्यानात हे सारं काही आलं. तात्काळ धावत जाऊन ती सुधीररावांच्या बाजूला जाऊन उभी राहिली. " आपल्या कॉलेजात आलेल्या माननीय पाहुण्यांसोबत असा अनादर व्यक्त करणारी मुलं आपल्या कॉलेजात आहेत ही दुर्दैवाची गोष्ट! पण ज्याप्रमाणे अशा मुलांच्या उपस्थितीमुळे आपल्या कॉलेजच्या प्रगतीत जशी बाधा न येता आपलं कॉलेज प्रगतीची शिखरं गाठत आहे त्याचप्रमाणे देशातील मोजक्या भ्रष्टाचारी लोकांच्या अस्तित्वाने आपल्या देशाच्या प्रगतीत बाधा येणार नाही!" नीलाच्या ह्या करारी बोलण्याने वातावरण अगदी पालटून गेलं. सभागृहातील मुलांनी एव्हाना त्या खट्याळ कार्ट्याला आणि त्याच्या साथीदारांना सभागृहाबाहेर पिटाळून लावलं होतं. सुधीरराव मोठ्या कौतुकाने नीलाकडे पाहत होते. इतक्यात मग एका अभ्यासू मुलाने FDI वर  प्रश्न विचारायला सुरुवात केली. ह्या विषयात तर सुधीररावांचा हातखंडा! मग त्यांनी पुढील अर्धा तासभर आपल्या ज्ञानाची पखरण सभागृहात केली. वेळ उलटून गेला तरी कोणालाच त्याचं भान राहिलं नाही. शेवटी मग नाईलाज म्हणून नीलानेच सुधीररावांना आवरतं घेण्याची नजरेने विनंती केली. कार्यक्रम संपल्यावर टाळ्यांचा कडकडाट पुढील दोन तीन मिनिटे चालूच राहिला. 

बऱ्याच दिवसांनी सुधीररावांना खूप खूप समाधान वाटत होते. बाहेर निघताना नीलाचे आभार मानण्याची संधी राहून गेली ह्याची बरीच चुटपूट त्यांना लागून राहिली. सुशांतने घरी परतताच त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन केलं. "अरे त्या नीलाचा नंबर आहे का तुझ्याकडे? त्या पोरीचं आभार मानायचंच राहून गेलं! तिने प्रसंगावधान दाखवलं म्हणून सारा कार्यक्रम यथासांग पार पडला!" आपल्याकडे नीलाचा मोबाईल क्रमांक नाही ह्याची पहिल्यांदाच सुशांतला जाणीव झाली. "बाबा मी तुम्हांला उद्या आणून देतो तिचा क्रमांक!" सुशांत काहीशा अपराधीपणाने म्हणाला. 

दुसरा दिवस उजाडला तोच एका मोठ्या बातमीने! महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीची अचानक घोषणा झाली होती. सत्ताधारी पक्षाचे बहुमत धोक्यात आल्याची वदंता गेले कित्येक दिवस होतीच. नाहीतरी पुढील सहा महिन्यात विधानसभेचा कालावधी संपणार होताच तर मग आताच निवडणुका घेऊन टाकाव्यात असा रास्त विचार केंद्र सरकारने केला होता. 

पुढील दोन आठवड्याचा काळ राव दक्षिण मुंबईत हॉटेलात तळ ठोकून होते. नीलाचा नंबर त्यांना सुशांतने दिला खरा पण तिला फोन करण्याची त्यांना संधी सुद्धा मिळाली नाही. त्यांच्या मोर्चेबांधणीचे यश त्यांना एकदाचे मिळालं आणि त्यांना निवडणुकीचे तिकीट मिळाल्याचं जाहीर झालं. रावांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. दोन आठवड्यांनी त्यांनी घरी प्रवेश केला. त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अगदी उत्साह पसरला होता. 

दुसऱ्या दिवशी राव विभागवार कार्यकर्त्यांच्या नेमणुकीत गुंतले होते. अचानक सत्ताधारी पक्षाने रावांच्या विरोधात एका तरुण डॉक्टरची उमेदवारी जाहीर केली. आणि रावांच्या पक्षात खळबळ माजली. 

वार्षिक कार्यक्रमामुळे अस्ताव्यस्त झालेल्या सबमिशनच्या व्यापात नीला अगदी गढून गेली होती. सर्व कार्यक्रमाचे अगदी खूप कौतुक झाले होते. पण नीलाला मात्र एक शल्य खुपत होतं. "कार्यक्रम चांगला झाला " असं एका वाक्याने कौतुक करून सुशांत Industrial Visit साठी बंगलोरला रवाना झाला होता. आणि रावांनी तर जाताना सुद्धा आभार मानले नव्हते. "होतं असं कधी कधी आयुष्यात!" असं म्हणत तिने स्वतःचीच समजूत काढली होती. आणि कालच त्यांना निवडणुकीचे तिकीट मिळाल्याची बातमी आली होती. 

अचानक तिच्या मोबाईलची रिंग वाजली. समोर राव होते. आपल्याकडून तिचे आभार मानायचे राहून गेले ह्याची खरोखरीची खंत त्यांच्या आवाजात जाणवत होती. त्यांच्या सारख्या इतक्या जेष्ठ नेत्याकडून फोन आल्यावर नीला झालं गेलं विसरून गेली होती. त्यांचे अभिनंदन करून फोन ठेवणार इतक्यात राव म्हणाले, "एक मिनिट थांब! माझ्या प्रचारासाठी एक युवा चेहरा मी शोधतोय! तू ही जबाबदारी घ्यायला तयार आहेस?"

 (क्रमशः)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...