मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, २३ ऑगस्ट, २०१५

वारसदार - भाग ५


 

पुढील तास दोन तासभर नीलाची समजूत घालण्यात गेले. "राजकारणी लोकांच्या नादाला लागण्यात अर्थ नाही असं म्हणतात ते काही उगीच नाही!" बाबा म्हणत होते. "तसं म्हटलं तर फार काय मोठं घडलं नाही आणि जे काही घडलं त्यात तुझी काही चूक नाही!" नीलाची समजूत घालण्यात आईने सुद्धा पुढाकार घेतला होता. दोघांच्या वास्तववादी बोलण्यानं नीला मात्र बरीच सावरली होती. अभ्यासाची बरीच मजल मारायची होती. ह्या घटनेने निराश होऊन बसण्यात काही अर्थ नव्हता. तिने आपल्या अभ्यासिकेत स्वतःला दोन तासभर कोंडून घेतलं. सुरुवातीच्या काही वेळानंतर अभ्यासात तिची चांगलीच लिंक लागली. दोन तासाभराचा अभ्यास झाल्यावर काहीशा प्रसन्न मनाने ती बाहेर हॉलमध्ये येण्यासाठी दार उघडायला गेली तर बाबा हळू आवाजात कोणाशी तरी बोलत असल्याचा आवाज तिला ऐकू आला. खरंतर असं लपून ऐकायची तिला सवय नव्हती पण नक्कीच ज्या अर्थी बाबा हळू आवाजात बोलत आहेत म्हणजे हा फोन सकाळच्या घटनेशी संबंधित असणार अशी अटकळ तिने बांधली. 
"हो हो ठीक आहे सुधीरराव!! हे कोण्या दुष्ट बुद्धीच्या लोकांचे कारस्थान आहे हे मी समजू शकतो! तुम्ही फोन केलात त्याबद्दल धन्यवाद!" असे म्हणत बाबांनी फोन ठेवला. 
काही क्षण दरवाजाशीच थबकलेली नीला काहीसा विचार करतच मग बाहेर पडली. बाबांनी तिला सोफ्यावर विसावू दिलं. "रावांचा फोन आला होता! " नीलाकडे पाहत बाबा म्हणाले. "ओ. के." मनातील भावनांचा अजिबात चेहऱ्यावर मागमूस लागणार नाही अशी काहीशी प्रतिक्रिया नीलाने दिली. "सर्वप्रथम आपल्या सर्वांची आणि खास करून तुझी त्यांनी क्षमा मागितली आहे! ह्या प्रकरणात आपल्या सर्वांना जो मनःस्ताप होतोय त्याबद्दल त्यांना खरोखर वाईट वाटल्याचं त्यांच्या बोलण्यावरून जाणवत होतं!" बाबांनी आपलं बोलणं पुढे चालू ठेवण्यास योग्य वातावरण आहे ह्याची खातरजमा करीत पुढील माहिती दिली. "हा मेसेज पाठविण्यास ज्यांनी सुरुवात केली त्यांच्यापर्यंत पोलिस आजच्या दिवसात नक्कीच पोहोचतील आणि आपला इंगा दाखवतील!" 
बाबांचे बोलणे थांबले तसा नीलाने एक हलकसा उसासा टाकला. "आई जेवण झालं असेल तर वाढ पाहू!" नको असलेल्या विषयावरील चर्चा थांबविण्याची ही नवीन पिढीची ही पद्धत आईला चांगलीच माहित होती. 

केवळ "सॉरी! जे काही घडलं त्याबद्दल आम्ही सर्व क्षमस्व आहोत!" whatsapp वरील ह्या एका संदेशाव्यतिरिक्त सुशांत अजून बरेच काही करू शकला असता असे नीलाला राहून राहून वाटत होते. "पण आपण उगाचच ह्या सर्व प्रकारात प्रमाणाबाहेर जास्त गुंतत चाललो नाही ना!" हा प्रश्न तिने स्वतःला विचारून पाहिला. मग मात्र तिचा प्रचंड गोंधळ उडाला. राव पडले पक्के राजकारणी; माणूस म्हणून कितीही चांगले असले तरी हल्लीच्या राजकारणात सतत राहून त्यांची माणुसकी कितपत शाबूत असणार ह्याबाबत नीलाला खात्री वाटत नव्हती. आणि राहता राहिला तो सुशांत! त्याच्या करियरपुढे आपण किती महत्वाचे आहोत ह्याचा थांगपत्ता नीलाला अजूनही लागला नव्हता. आणि जरी समजा त्याने आपल्याशी लग्न केलं आणि जर तो असाच स्वतःच्या करीयर मध्ये गुंतून बसला तर मग ते आपल्याला आवडेल का? ह्या प्रश्नाचे उत्तर नीलाचे मन नकारार्थीच देत होते. ह्या सर्व गुंत्यातून बाहेर पडण्याचा तात्पुरता मार्ग म्हणजे अभ्यासात स्वतःला झोकून देण्याचा होता. आणि नीलाने तोच पत्करला. अभ्यास सुट्टीच्या शेवटच्या दहा दिवसात तिने अभ्यासात स्वतःला अगदी झोकून दिलं.

मधल्या काळात विधानसभेच्या निवडणुका होऊन गेल्या. अभ्यासाच्या इतक्या तणावातसुद्धा मतदान करण्याची प्रथम संधी युवा वर्गाने न गमाविण्याचा चंग बांधला होता. मतदानकक्षात एक क्षणभर थांबलेली नीला शेवटी रावांनाच मत देऊन बाहेर पडली होती. 

परीक्षेत नीलाच्या परिश्रमाला चांगलेच यश मिळालं होतं. सर्व पेपर अगदी मस्त गेले होते. नेहमी भय देणारा A.T.K.T. नावाचा बागुलबुवा यंदा कोठेतरी दूरवर पळून गेला होता. शेवटचा पेपर संपला तसं ती आणि शलाका काही वेळ कॉलेजातच रेंगाळत राहिल्या होत्या. "सुशांत काय म्हणतो गं!" शलाकाच्या ह्या थेट प्रश्नाने नीला अगदी दचकुन गेली. ह्या प्रकरणाची कॉलेजात थोडीफार चाहूल लागली असली तरी परीक्षेच्या दडपणात कोणी काही बोललं नव्हतं आणि अगदी खास असली तरी हिच्याशी बोलण्याइतपत मामला पुढे गेला आहे असे नीलाला वाटत नसल्याने तिने अजून तिच्यापाशी ह्याचा उल्लेख केला नव्हता. उत्तर देण्यासाठी चाललेला नीलाच्या ओठांचा संघर्ष तिच्या डोळ्यातील तिच्या नकळत थबकलेल्या अश्रूंनी सोडवला. "अग वेडूबाई! चल आपण कोठेतरी बाहेर जाऊन बसू!" शलाकाने जवळजवळ तिला ओढतच बाहेर नेले. 
नीलाने आपल्या मनीच्या भावना शलाकाजवळ मोकळ्या केल्या. खरं म्हटलं तर कॉलेजात ह्या विषयी कुजबुज चालूच होती जी शलाकाच्या कानी पडली होती. पण ती मात्र तिने नीलाला सांगणं ह्या क्षणी टाळलं. आता चांगली तीन आठवड्यांची सुट्टी असणार होती. सुट्टीत एकमेकांच्या घरी किमान एकदा तरी भेट देण्याचे वचन देऊन दोघींनी एकमेकांचा निरोप घेतला. 

सुट्टीचे पहिले दोन दिवस नीलाने चांगली ताणून दिली होती. परीक्षेनंतर खरंतर अजून झोपा काढायचा तिचा मनसुबा आईच्या अचानकच्या पुणे वारीच्या बेताने बाजूला सरला गेला. रात्री आई आणि ती बॅगा भरत असताना "अगदी मतमोजणीच्या दिवशीच पुण्याला जायचं तुम्हांला कसं सुचलं ?" बाबांच्या ह्या प्रश्नाने नीलाला भानावर आणलं. आईसुद्धा विचारात पडल्यासारखी तिला वाटली. मतमोजणीच्या दिवशी प्रवास टाळावा हे बाबांचं म्हणणं तसं बरोबरच होतं. "आता करायचं तरी काय" अशा विचारात ती आणि आई सोफ्यावर बसल्या. "मुळचा बेत आईचा, घेऊ दिला काय तो निर्णय!" असा विचार करीत नीला उठून खोलीकडे निघाली. दोन पावलं पुढे जाते तितक्यात आपला मोबाईल विसरली म्हणून ती मागे वळली तर "तुम्ही इतके बावळट कसे!" अशी बाबांकडे पाहत असलेल्या आईची मुद्रा तिच्या नजरेस पडली. तिच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. मागचा प्रकार पाहता मतमोजणीच्या दिवशी आपण इथे असायलाच नको अशी आईची इच्छा असणार हे तिला उमगलं. नीला अशी अचानक मागे वळल्यावर आई मात्र अगदी गांगरून गेली. मग कोणी काहीच बोललं नाही. नीला मात्र काही वेळाने खोलीतून बाहेर आली, "आई तुझं म्हणणं बरोबर आहे, आपण उद्या जाऊयात पुण्याला सकाळी!" दुसऱ्या दिवशी सकाळी ह्या दोघी एशियाडने पुण्याला पोहोचेस्तोवर मतदानाचे कौल बऱ्यापैकी स्पष्ट होत चालले होते. रावांनी आपल्या मतदारसंघात विक्रमी आघाडी घेतली होती. आणि त्यांचा पक्षसुद्धा सत्तेवर येईल अशी स्पष्ट चिन्हे दिसू लागली होती. नीला आणि आई ह्या दोघींनी ह्या  सर्व प्रकारापासून दूरच राहणे पसंत केलं.

बाबा आज रात्री घरी एकटेच होते. दाराची बेल वाजली तर आपण ऑर्डर केलेली पावभाजी घेऊन हॉटेलातून कोणी आलं असावं असं त्यांना वाटलं. पण दार उघडताच त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. रावांचा एक खास माणूस मिठाईचे बॉक्स घेऊन दाराशी उभा होता. दारातूनच त्यांनी रावांना फोन लावला. नीला घरी नाहीय हे कळताच रावांची काहीशी निराशा झाली. "आमच्या यशाला नीलाच्या प्रचाराचा खूपच हातभार लागला! तरुण मतदारांची जवळजवळ ७५% टक्के मते मलाच मिळाली आणि ती फार निर्णायक ठरली!" रावांचा उत्साह फोनवरून सुद्धा उतू जात होता. "नीला परत आली की तुम्ही सर्व घरी जेवायलाच या!" असे सांगून त्यांनी फोन ठेवला. स्त्रिया किती दूरदृष्टीच्या असतात ह्याची खात्री बाबांना आता येत होती. आज नीला इथं असती तर पुन्हा त्या आठवणी बाहेर निघाल्या असत्या. 

दोन दिवसासाठी म्हणून ठरलेलं आईचं माहेरचं वास्तव्य मग आठवडाभर वाढत गेलं. नीलाने सुद्धा त्याला फारसा आक्षेप घेतला नाही. सुट्टीवर परत आल्यावर मग शलाकाशी एकदा भेट झाली. बघता बघता सुट्टी संपून गेली आणि सातवं सेमिस्टर सुरु झालं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कॉलेज सुरु होऊन दोन आठवडे होत नाही तोवर मुंबई विद्यापीठाने सहाव्याचा निकाल घोषित केला. आमदारपुत्र सुशांत त्याच्या शाखेत विद्यालयातून प्रथम आले होते!! आणि नीलाच्या परिश्रमाला यश मिळून तिने तिच्या शाखेत पहिल्या पाचांत स्थान मिळविले होते. सर्वांचे लक्ष आता महाविद्यालयात मुलाखतीसाठी येणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांकडे लागून राहिलं होतं. 

ह्या मुलाखतींसाठी काही खास तयारी करण्याच्या मनःस्थितीत नीला नव्हती. मिळाली नोकरी तर हो अशीच काहीशी बिनधास्त वृत्ती ठेवून ती पहिल्या मुलाखतीला गेली. पहिली फेरी संपली आणि त्यात ती निवडली गेली. दुसऱ्या फेरीत ग्रुप डिस्कशन होते. ह्यात तर तिने अगदी बाजीच मारली. ह्या फेरीच्या वेळी बहुदा त्या कंपनीच्या आलेल्या पथकातील सर्वात जेष्ठ सदस्य तिथे उपस्थित होता. तो नीलाच्या संभाषणचातुर्यावर जबरदस्त खुश होता. पुढे मग नीलाची निवड होणे ह्यात केवळ औपचारिकताच बाकी राहिली होती. संध्याकाळी अगदी उशिरा ह्या मोठ्या कंपनीने आपल्या निवडलेल्या मुलांची यादी जाहीर केली. यादीत अपेक्षेप्रमाणे सुशांतचे नाव अगदी वरच्या स्थानावर दिमाखात झळकत होते. यादीच्या शेवटून दुसऱ्या क्रमाकांवर होती नीला!! "आई, माझी  किन्नई RBS च्या बंगलोर शाखेत निवड झाली!! भलं मोठं पॅकेज देऊ केलंय त्यांनी मला!!" नीलाचा उत्साह ऊतू जात होता. सुशांतचे यादीच्या अग्रस्थानी असलेलं नाव कसं कोणास ठाऊक पण तिच्या नजरेतून सुटलं होतं. 

(क्रमशः)

1 टिप्पणी:

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...