मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

मंगळवार, १४ जुलै, २०१५

रम्य ते बालपण - ४


 
एकत्र कुटुंब आणि बर्यापैकी मोठी वाडी ह्यामुळे त्यावेळी बऱ्याच कामगार वर्गाचा घरी राबता असे. शेतीत काम करणारी हे सर्व कामगार अगदी घरच्या मंडळीप्रमाणे लहान मुलांची काळजी घेत. ह्यातील प्रत्येकाची खास व्यक्तीवैशिष्टे असत.

मोठी आईचे माहेर मुळगावचे. तिच्या माहेरून आलेला बाबुराव पण घरी काही काळ होता. हा अगदी रंगात आला की "अपलम चपलम" , "तू गंगा की मौज मै यमुना का धारा!!" अशी ठेवणीतील गाणे गाऊ लागे. मग दिदीच्या नेतृत्वाखाली बच्चेमंडळी त्याची फिरकी घ्यायला सज्ज होत. 

रुपजी काका आणि गुलाब काकू हे जोडपे बहुदा ७० च्या दशकापासून घरी राहायला असावे. रुपजी काकाचा उल्लेख बाउल प्रकरणात येउन गेला आहे. त्यांची तीन अपत्ये दीपक, राजू  आणि सुरेखा. दीपकने मला विटी दांडू आणि गोट्या खेळाचे नियम शिकवले. विटी दांडू मध्ये तो मला ९९.९९% हरवायचा. पहिल्या फटक्याने हवेत उडवलेल्या विटीला हवेतच पुन्हा दांडूने मारल्यास दुप्पट गुण मिळत असे मला काहीसं आठवतं. पण मला ह्या दोन्ही खेळात काही विशेष गती प्राप्त न झाल्याने मी ह्या खेळांपासून दुरावला गेलो. दीपक तसा हरहुन्नरी होता. केळीच्या दोन लोदांना (जाड बुध्यांना) मजबूत रस्सीने जोडून त्याने त्याची कामचलावू नौका बनवली होती. गढूळ पाण्याने भरलेल्या बावखलात त्याची ही नौका आणि त्यावर दीपक हे दृश्य मला काहीसं स्मरत. पण पूर्ण खात्री नाही. 

दीपकची मस्ती दिदीला फार खटकायची. एकदा तिचा राग अनावर होऊन तिने त्याला पूर्ण अंगभर बाम चोळला. त्यामुळे कासावीस झालेल्या दीपकला पाहून गुलाबकाकू नाराज झाली होती.

कालांतराने हे जोडपे बेण्यावर स्थलांतरित झाले. रुपजीकाका लवकरच निवर्तले. आणि दीपक, राजू सुद्धा! पण गुलाबकाकू अजूनही काम करते.

अंगमेहनतीची खास कामे करण्यासाठी घाटावरून आलेले तातोबा आणि त्याचे कुटुंब येई. हा तातोबा प्रसिद्ध अभिनेता राजकुमार सारखा दिसायचा. त्यालाही तसंच वाटायचं की नाही हे मला ठाऊक नाही. तो एकदा एका प्रकरणात अडकला. त्याने मग वकील वगैरे केले. हे वकील एकदा अण्णांना भेटायला घरीही येऊन गेले. मग काही वर्षाने बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाल्यावर तातोबा मोठ्या अभिमानाने सांगत आला की "हेच माझे वकील होते!"

मे महिन्यात खूप वेळ असे. त्यावेळी मोठी माणसे सायकलवर फिरत. लहान मुले साधारणतः आठवी नववी पर्यंत ही सायकल चालवू शकत नसत. आणि त्यावेळी लहान मुलांना हजारो रुपयाच्या सायकली विकत घेण्याची पद्धत नव्हती. होळीवर एक दोन दुकाने होती. तिथे भाड्याच्या सायकली मिळत. पन्नास पैसे अर्धा तास आणि एक रुपया एक तास! ज्याला सायकल येते अशा मोठ्या भावंडाची  किंवा मित्राची विनवणी करून त्यांच्याकडून सायकल अंगणापर्यंत आणली जात असे. मग पुढील अर्धा तास मुलं पडत, खरचटवून घेत. पण कधीतरी मग सायकल शिकत! ह्या सायकल शिकण्याच्या कालावधीत मला सायकल चालवता येत आहे ह्याची बऱ्याच वेळा स्वप्ने पडत! दोन्ही हात सोडून काही अंतर सायकल चालवू शकणारा मुलगा प्रसिद्ध असे. 


आईचे माहेर बोर्डीला! तिथे माझी मोठी बहिण सुस्मितताई आणि बंधू बऱ्यापैकी मे महिन्यात राहिले. पण मी मोठा होईस्तोवर आईचे तिथे जाणे हळूहळू कमी होत चालले. तरी देखील बोर्डीचे अण्णा आणि आजीच्या आठवणी मला बर्यापैकी स्मरतात. मे महिन्याची सुट्टी संपून परत यायची वेळ झाली की रमणचा प्रसिद्ध टांगा बोलाविला जाई. आणि मग त्यात भाई, आई, आम्ही तिघे आणि बऱ्याच काही आठवणी घेऊन आम्ही परतत असू ! बोर्डीहून परतणाऱ्या गाड्या अगदी संथ गतीने धावत. तशा अजूनही संथ गतीने धावतात. वाटेत मग डहाणूची डाळ घेतली की आम्ही धन्य होत असू. 
बोर्डीचा समुद्रकिनारा सुंदर आहे. तिथे आम्ही संध्याकाळी फिरायला जात असू. उत्तरेला असेच चालत गेले की झाई गाव लागतं. ते गुजरात राज्यात आहे असे मला सांगण्यात आले होते. एका अशाच संध्याकाळी ओहोटीच्या वेळी आम्ही एक समुद्रातील पाण्याचा प्रवाह (ओढा) ओलांडून पलीकडे गेलो. त्यावेळी बंधू किंवा सुपितताईने मला आपण झाईत म्हणजे गुजरात राज्यात आलो आहोत असे सांगितलं. ती पूर्ण संध्याकाळ मी धन्य होतो. पुढे जून महिन्यात शाळा उघडल्यावर मित्रांना कधी एकदा हे सांगतो असे मला झाले होते. हल्लीच्या मुलांत युरोपला वगैरे गेल्याशिवाय अशी भावना निर्माण होत नाही. 

बोर्डीच्या अण्णांचे कुटुंबीय काही अंतरावर असलेल्या वाडा ह्या ठिकाणी राहत. "अण्णा वाड्यात गेलेत!" हे वाक्य आम्ही बऱ्याचजणांना सांगायचो. अण्णांचे मित्र शांताराम म्हणून होते. ते अण्णांना भेटायला बऱ्याच वेळा यायचे. त्यांची एक खासियत होती. ते अंगणात पडलेल्या सावलीवरून घड्याळाची वेळ अचूक सांगत. ते आले की मी त्यांना वेळ विचारे. मग ते सावलीकडे निरखून पाहत आणि मग मला वेळ सांगत. मग मी धावत जाऊन घरातील घड्याळात वेळ पाहून धन्य होऊन येई. 

बंधू आजूबाजूच्या अण्णांच्या शेजाऱ्यांशी मनमोकळेपणाने गप्पा मारत असल्याने त्यांच्यात प्रसिद्ध होता. समोरच्या पाटलांकडचेअजित बंधुपेक्षा
वयाने बरेच मोठे असले तरी बंधूला दोस्त म्हणत! एकदा जोशात येउन बंधू त्यांना म्हणाला, "इतके दोस्त वगैरे म्हणता तर आइसक्रीम वगैरे खिलवा की!" अजितभाऊंनी ही गोष्ट फार मनावर घेतली. लगेचच सायंकाळी आम्हां सर्वांना समुद्रकिनाऱ्यावरील हॉटेलात घेऊन गेले.खिशातील शंभरची नोट बंधूला दाखवत म्हणाले, " तुझा दोस्त म्हणजे काय कमी समजू नकोस!" गोल्ड स्पॉट किंवा थम्सअप वर दहा रुपयाच्या वर खर्च करायची सवय नसलेल्या आम्हां सर्वांना ह्या गोष्टीचे फार मोठे अप्रूप वाटलं होते. सुपितताईची वसईच्या शाळेतील खास मैत्रीण नंदा हिचे सुद्धा बोर्डीला बहुदा आजोळ होते. त्यामुळे ती सुपितताईला तिथे भेटायची. मग सुपितताई खुश व्हायची. त्यावेळच्या पद्धतीनुसार सुपितताईवर घरातील मोठी मुलगी असल्याने कामाचा तसा बोजा पडायचा. 


बोर्डीला बऱ्याच वेळा पॉलीश न केलेला तांदुळ भातासाठी वापरत त्याचीसुद्धा एक वेगळी पण सुरेख चव असे! बोर्डीला आंब्याच्या वेगळ्या जाती असत. ते ही मनसोक्त खायला मिळत! अंगणात सकाळी वासुदेव येई. एका आठवड्यात विष्णू, राम वगैरे रूपे पाहून खुश झालेला मी नंतर अंगणात रावण प्रकटलेला पाहून पूर्णपणे भयभीत झालो होतो. दुपारी कधी मधी फेरीवाले पत्र्याच्या डब्यात नानाविध बिस्किटे , नानकटाई वगैरे घेऊन येत. ही बिस्किटे पाच रुपयाला शंभर असल्या स्वस्त दरात मिळत.

दुपारी जेवणं वगैरे आटोपली की आम्ही मेंढीकोट खेळायला बसू. खाली गोणपाट अंथरलेले असे. अण्णा सुद्धा सामील होत. हुकुम जो लपवित असे तो चतुराईने पायाखाली लपविलेले पान बाकी कोणाचे लक्ष नसताना हळूच वर करून समोरच्याला दाखवे. मग समोरचा कान पकडून, जीभ बाहेर काढून चौकट, बदाम वगैरे हुकुम असल्याचे खुणेनेच सांगे. बऱ्याच वेळा ही मंडळी पकडली जात मग मोठा गदारोळ माजे! गोणपाट अंथरून त्यावर मेंढीकोट खेळायला बसण्यात ह्या चतुराईला अनुकूल वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न असावा असेच मला अजूनही वाटत आले आहे. पुढे १९८४ साली आजी अचानक स्वर्गवासी झाली आणि मग बोर्डीच्या फेऱ्या खूप कमी झाल्या. 

(क्रमशः)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...