मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, ३० मे, २०१५

तन्नू आणि मन्नू - विवाहोत्तर प्रवास


 

पुन्हा मे महिना, एक उन्हाळी सुट्टी, सकाळी साडेतीनच्या आसपास  सुरु होणारा पक्षांचा किलबिलाट, बाग शिंपणे,आंब्यांचा आनंद लुटणे अशा उन्हाळी सुट्टीतील आनंदाच्या अनेक क्षणात हल्ली एखादा नवीन  चित्रपट पाहणे ह्या प्रसंगाची भर पडली आहे. असाच सध्याचा ऐकीव माहितीच्या आधारे चांगला म्हणून गणला गेलेला चित्रपट म्हणजे तन्नू वेड्स मन्नू - रिटर्न्स हा! परंपरेनुसार कोणता चित्रपट पहायचा ह्यावर आमचे बराच काळ बौद्धिक चाललं. सध्याचा अमिताभ डोक्यात जातो, अग बाई अरेच्च्या चे परीक्षण तितकेसे चांगलं नाही अशा सर्व चर्चेनंतर तन्नू वेड्स मन्नू - रिटर्न्स हा भाग्यवान चित्रपट ठरला. 

हल्ली तंत्रज्ञान  प्रगत झालं आहे. पण त्याचा वापर आपण तितक्याच योग्य  करतो  हा वादाचा मुद्दा! संध्याकाळी सहाचा खेळ पाहण्यासाठी तिकिटे उपलब्ध आहेत की नाही  पाहण्यासाठी बुक माय शो च्या संकेतस्थळास  आम्ही चौकशी करण्याच्या हेतूने भेट दिली. तिथे बऱ्याच सीट्स आरक्षित दिसत होत्या. पण काही कारणास्तव आम्ही तिकिटे भ्रमणध्वनिवरून आरक्षित केली नाहीत. सायंकाळी सहाला दहा मिनिटे असताना काहीशी धाकधूक मनात ठेवूनच मल्टीप्लेक्सला पोहोचलो  तेव्हा केवळ ७ - ८ माणसे तिथे आजूबाजूला रेंगाळताना दिसली. तिकीटबारीवर झटकन तिकिटे मिळाली. 

सहाच्या सुमारास आम्हां १० - १५ प्रेक्षकांना आत सोडण्यात आले. एक दोन जाहिराती दाखवून झटपट चित्रपटाला सुरुवात'करण्यात आली. ह्या गडबडीमध्ये राष्ट्रगीत राहून गेलं. हा चित्रपटाचा सिक्वेल म्हणजे दुसरा भाग असल्याने आदर्श परिस्थितीत पहिला भाग पाहून मगच दुसरा भाग पाहायला हवा. पण आदर्श परिस्थिती हल्ली फेसबुकच्या फोटो, स्टेटस शिवाय राहिलंय कुठे? नेहमीप्रमाणे प्रस्तावना बरीच लांबली. 

चित्रपटाची सुरुवात इंग्लंड मधल्या एका ढगाळ, उदास वातावरणाच्या पार्श्वभूमीवर विवाहित जोडप्यांच्या समुपदेशन केंद्रात ! विवाहानंतरच्या चार वर्षात ह्या जोडप्यातील मतभेद पराकोटीला गेले आहेत. हे दोघं आपल्या वैयक्तिक संबंधांची चिरफाड ह्या समुपदेशकासमोर अगदी उघडपणे करताना आढळतात. आपल्या सर्वांना चांगलाच माहित असलेला आणि मी बऱ्याच वेळा मांडलेला मुद्दा! दोन माणसं ती नवरा बायको का असेनात ज्या वेळी सतत एकत्र असतात तेव्हा एकमेकांचे गुण दोष अगदी जवळून दिसतात. पूर्वी पतीला जे परमेश्वराचे रूप दिले जायचे त्यामुळे तो परीक्षणापासून वाचला जायचा. आज असं काही होत नाही, पतीचे थेट परीक्षण होतं अगदी त्याला ८० किलोचं पोतं म्हणेपर्यंत! पती सर्वगुणसंपन्न वा गुणसंपन्न केव्हाच नव्हते. परंतु त्यांना पूर्वी विवाहसंस्थेतील पती ह्या संस्थेचे कवच होते. आज हे कवच नाहीसे झालंय. ह्या प्रसंगात संवाद अगदी उघडपणे, कसलीही भीडभाड न बाळगता बोलले जातात. बहुदा हे आपल्या समाजाने आता पूर्णपणे स्वीकारलं आहे. ह्या पुढे जी आपली नैतिक प्रगती व्हायची ती आजच्या ह्या पातळीला प्रमाण मानून! 
चर्चेत नवरा आपला तोल गमावून बसतो आणि वेड्यांच्या इस्पितळात भरती होतो. आणि बाईसाहेब भारतात परततात. कंगनाचे भारतातील एकत्र कुटुंब म्हणजे धमाल! त्यात अनेक नातेवाईक आणि बळजबरीने घरातील खोली बळकावून बसलेला आणि कायद्याचा अभ्यास करीत बसलेला भाडेकरू. विवाहापूर्वी कंगनाचे बरेच मित्र! त्यातला एक तर रिक्षावाला नेमका तोच तिला स्थानकावर भेटतो. "माझी आठवण येते का कधी कधी!" कंगना त्याला विचारते. "हो येते ना कधी कधी!" तो उत्तरतो. "नक्की कधी?" असा खोचक प्रश्न कंगना विचारते तेव्हा तो सूचक हसतो. तसंच भाडेकरू पहिल्यांदा तिला "दिदी" म्हणून संबोधितो तेव्हा ती त्याला "केवळ संबोधिण्यापुरती दिदी म्हणतो आहेस की मनात सुद्धा तशीच शुद्ध भावना आहे?" असा प्रश्न करते. अशा प्रकारचे संवाद केवळ उत्तर भारतीय चित्रपटात असू शकतात. आज ते अशा प्रकारच्या संवादामुळे सर्व भारतभर पसरू लागले आहेत. अशा संवादामुळे प्रत्येक स्त्री अशाच प्रकारचा विचार करते असा समज अर्धवट अकलेचे लोक करतात. 
भारतात परतण्यापूर्वी आपल्या नवऱ्याची दया येऊन त्याच्या सुटकेची तजवीज कंगना करते ती त्याच्या भावाला सुटकेसाठी इंग्लंडात जायला सांगून! ह्या भावाला आपल्याच लग्नाची घाई लागून राहिली असते. 
माधवन साहेब सुद्धा भारतात परततात ते मनात एकंदरीत ह्या विवाहाविषयी जबरदस्त कडवट चव ठेवूनच. त्यांना विवाहसंस्थेविषयी वैफल्य आले नसावे असं वाटत राहत. काहीशा संभ्रवावस्थेत असतानाच त्यांचं लक्ष कंगनाच्या दुसऱ्या अवताराकडे जाते. माझं कंगनाच्या मूळ रूपावर इतकं प्रेम आहे परंतु वास्तविक जीवनात जे काही चटके बसले त्यामुळे मी तिच्यापासून दुरावलो गेलो. जर ती पुन्हा तिच्या मूळ रुपात माझ्यासमोर आली तर मी पुन्हा तिच्या प्रेमात पूर्णपणे झोकून देईन अशी काहीसा उदात्तीकरणाचा प्रयत्न. पण खरं पाहिलं तर विशीच्या वयातील मुलीच्या प्रेमात ह्या ८० किलोच्या पोत्याने पडायचं काहीच कारण नाही. आणि ह्या प्रेमाचं उदात्तीकरण करणं एका मर्यादेपलीकडे शक्य नाही ह्याच भान काही प्रमाणात दिग्दर्शकाने ठेवलेलं दिसतं. 
आपल्या नवऱ्याच्या ह्या उद्योगाविषयी अनभिज्ञ असलेली कंगना आपल्या स्वभावानुसार आपल्या विवाहापूर्वीच्या मित्रांसोबत आपले उद्योग सुरु ठेवते. ह्यात असतो एक अवस्थी! भाडेकरूच्या शब्दात सांगायचं झालं तर कंगनाच्या लग्नात दोन घोड्या आलेल्या असतात त्यातील एक पाठवणारा हा अवस्थी! पण जो जिता वो सिंकदर ह्या उक्तीनुसार माधवन बाजी मारून गेलेला असतो. पण  माधवनच्या नवीन प्रकरणात सुद्धा अवस्ठीचे पाय अडकलेले असतात आणि त्याचे कारण सुद्धा तेच! कंगनाच्या ह्या अशा वागण्यामागचं कारण शोधायचा दिग्दर्शक प्रयत्न करीत नाही. किंवा पहिला भाग न पाहिल्याने मला हा प्रश्न पडला असावा. कारण बहुदा स्वत्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न असं आपण म्हणू शकतो. हा स्वत्वाचा शोध घेण्याची चैन मोजक्या लोकांना परवडू शकते. बाकी सर्व आपल्यासारखे सामान्य जीव भाकरीचा शोध घेण्यात जीवन घालवितात. 
कोल्ह्याला द्राक्ष आंबट ह्या उक्तीनुसार भाडेकरू अवस्थी आणि कंगनाच्या वाढत्या मैत्रीची खबर जगजाहीर करण्याचा प्रयत्न करतो आणि मध्येच मग कंगनाला आपल्या पतीउद्योगाची माहिती पडते. मनापासून हादरलेली कंगना आपले स्वातंत्र्याचे प्रयोग थांबवून मग आपला नवरा परत मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करते. इथे ह्या कंगनाच्या व्यक्तिमत्वाचा शोध घ्यायचा मी प्रयत्न करतो. पण बहुदा हे व्यक्तिमत्व रंगविण्याची दिग्दर्शकाने फारशी तसदी घेतली नसावी त्यामुळे मलाही काहीच हाती लागलं नाही. मी मला वाटेल तितके मुक्तउद्योग करीन पण ज्या क्षणी माझा नवरा माझ्या हातातून निसटू शकेल अशी मला भीती वाटेल त्यावेळी मी मात्र सर्व उद्योग थांबवून सती सावित्री बनेन हा सारांश!
धावपटू कंगनाचे व्यक्तिमत्व काहीसं पटू शकतं. केवळ करियर आणि कौटुंबिक जबाबदारी ह्याच्या पलिकडे विश्व न पाहिलेल्या आणि गावातून शहरात आलेल्या एका मुलीला ज्यावेळी अचानक कोणीतरी आपल्यावर व्यक्ती म्हणून प्रेम करते ह्याची जाणीव होते तेव्हा ती मनातून बहरून जाण्याची शक्यता नक्कीच निर्माण होणार. आणि कंगनाने हे अभिनयातून मस्त फुलवून दाखवलंय. मामला अगदी लग्नापर्यंत पोहोचतो. आपल्याला अनपेक्षितपणे मिळालेलं हे प्रेम मग हातातून निसटून जाऊ नये म्हणून ही तरुण कंगना जीवाचा आटापिटा करते… पण 

चित्रपटातील व्यक्तीमत्वांचा आणि विवाहातील भावनिक नात्यांचं विश्लेषण पाहण्याची अपेक्षा ठेवून चित्रपट पाहायला गेल्यास अपेक्षापूर्ती न होण्याचीच शक्यता जास्त! पण एक अनुभव म्हणून चित्रपट नक्कीच उत्तम! कंगना चित्रपट एकटीच्या खांद्यावर वाहून नेते. 
जाता जाता लक्षात राहिलेला एक प्रसंग! माधवन, भाऊ आणि वडील सोमरसपानाचा आस्वाद घेत बसले असतात. मागे आईची अनेक क्षुल्लक कारणावरून अखंड कटकट चालू असते. अगदीडोक्यात भिडेल अशी. माधवनचे वडील म्हणतात - "संसार हा असाच प्रवास असतो. जोवर झेपेल तोवर सहन करायचा आणि ज्यावेळी सहनशक्तीच्या पलीकडे जाईल तेव्हा … " असं म्हणत ट्यूबलाईट फोडून टाकतात. आधुनिक युगांतील अनेक भारतीय पुरुषांच्या हृदयाला भिडलेला हा प्रसंग!!! आता तिसऱ्या भागाची वाट पाहतोय मी !!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...