मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

बुधवार, २८ जानेवारी, २०१५

आप यूँ फासलों से ...


 
लहानपणी ऐकलेलं, आवडलेलं हे गाणं मधूनच रेडिओवर लागलं की मग पुन्हा अस्वस्थ करून जातं. ह्या गाण्याचा अर्थ जाणून घ्यायचा कधी प्रयत्न केला नव्हता, तरीही हे गाणं का कोणास ठाऊक कुठतरी मनात कायम दडून राहत. आज थोडी फुरसत मिळाली आणि मग ठरवलं की जरा गाण्याचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करावा.

चित्रपट १९७७ सालचा शंकर हुसेन. गीत जां निसार अख्तर ह्यांचं. एका हिंदू बापाने वाढविलेल्या अनाथ मुस्लिम मुलाची ही कथा! कथानकात खोलवर जाण्याचे इथे प्रयोजन नाही. त्या काळी नायकाला सर्वस्व मानणाऱ्या नायिकांचे चित्र रेखाटलं जायचं. जसं ते चित्रपटातून दर्शविलं जायचं तसंच गीतातून सुद्धा प्रकट व्हायचं. हल्ली सर्व काही, प्रेमासकट  डोकं ताळ्यावर ठेवून केलं जात असल्याने अशा भावना व्यक्त केल्या जात नाहीत. 


आप यूँ फासलों से गुजरते रहे
दिल से कदमों की आवाज़ आती रही 


दूर कोठून तरी तू असाच जात होतास, पण माझ्या हृदयात मात्र तुझ्या पावलांचे नाद घुमत राहिले.  

आहटों से अंधेरे चमकते रहे
रात आती रही, रात जाती रही







केवळ तुझ्या चाहुलीने अंधारात आशेचे किरण चमकत राहिले. अशा अनेक रात्री आल्या आणि निघून गेल्या!


गुनगुनाती रही मेरी तनहाईयाँ
दूर बजती रही कितनी शहनाईयां
जिंदगी, जिंदगी को बुलाती रही



आजूबाजूला आनंदाचे अनेक प्रसंग येत होते. माझे एकटेपणाचे नाद असेच आसमंतात  घुमत राहिले. माझ्यातील जिवंतपणाची चिन्ह माझ्या सर्वस्वाला म्हणजेच तुला कायम बोलावत राहिली. 


कतरा कतरा, पिघलता रहा आसमान
रूह की वादियों में ना जाने कहा
एक नदी दिलरुबा गीत गाती रही







आकाशातून अधूनमधून वर्षा होत राहिली. (माझ्या नयनांतून अधूनमधून अश्रू वाहत राहिले).  दरीखोऱ्यातून भटकणाऱ्या आत्म्याच्या मनात एक प्रेमाचे गाणं कायम गुंजत राहिलं.


आप की गर्म बाहों में खो जायेंगे
आप की नर्म जानों पे सो जायेंगे
मुद्दतों रात नींदे चुराती रही


तुझ्या उष्ण बाहुपाशात मी विरघळून जाईन. तुझ्या मऊशार छातीवर मी निद्रा घेईन. अशाच आशेवर रात्रभर माझी झोप अधूनमधून चाळवत राहिली.
 
ह्या गीताच रसग्रहण करण्याचा प्रयत्न म्हणजे एक शिवधनुष्य उचलण्यासारखा होता. तो व्यवस्थित झेपला नाही हे मध्यंतरी जाणवले. 

त्यानंतर मग अशीच काही नायिकेच्या भावनांचे विविध पैलू उलगडून दाखविणारी काही गीते मला आठवली. ह्या प्रत्येक गीताचं रसग्रहण करण्याचा पुन्हा प्रयत्न मी करणार नाही. पण प्रत्येक गीतातील प्रेयसीची  जाणवणारी एक मुख्य भावना इथे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे

२) अजनबी कौन हो तुम जबसे तुम्हे देखा हैं!

ह्या गीतात एका अनोळखी व्यक्तीला भेटल्यावर नायिकेचे विश्वच पूर्णपणे बदलून गेलं आहे. संपूर्ण विश्वच आपल्या नजरेत सामावून गेल्याचा तिला भास होत आहे. फुलांच्या प्रत्येक गुच्छात, गाण्याच्या प्रत्येक ओळीत तिला हा अनोळखी माणूस भेटत आहे. कित्येक वर्षे ज्याची वाट पाहिली तो पाऊस एकदाचा आला असा भास तिला होत आहे. प्रत्येक श्वासातून शहनाईचे सूर उमटल्याचा तिला भास होत आहे. अंधाराने भरलेल्या माझ्या विश्वात आशेचा एक किरण आला आहे. जेव्हा रात्र येते त्यावेळी तुझा मोहक गंध पूर्ण आसमंतात भरून राहतो. 

बाकी ह्या गाण्यातील गोंडस विनोद मेहरा आणि सुंदर शबाना केवळ लाजबाबच!



३) ये मुलाकात एक बहाना हैं!
प्यार का सिलसिला पुराना हैं!

आपल्या दोघांचं प्रेम जन्मोनजन्म चालू आहे. ही भेट तर केवळ एक निमित्त आहे. आपण इतके जवळ येऊयात की हृदयाचे नाद एकमेकांत मिसळून जातील. मी ज्यावेळी माझ्या प्रियकराच्या मिठीत असेन त्यावेळी संपूर्ण विश्वातील सुखे माझ्या पायाशी लोळण घेत असल्याचा भास मला होतोय. स्वप्नं तर काचेहून नाजूक असतात, ती तुटू नयेत म्हणून खूप काळजी घ्यावी लागणार आहे!!

४) सावन के झुले पडे, तुम चले आओ!

निसर्ग कधी अचानक अगदी सुंदर रूप घेऊन आपणासमोर येतो, तर कधी पाऊस, बर्फवृष्टी, सूर्यास्त अशी हळव्या माणसाला अधिकच भावूक बनविणारी रूपे घेऊन आपणासमोर येतो. अशावेळी ती प्रिय व्यक्ती जवळ असावी अशी भावना उफाळून येते.

५) बहारों मेरा जीवन भी सवारों, कोई आये कहिसें, तुम पुकारो!

हे गीत पण काहीसे सावन के झुले पडे सारखंच! फरक इतका की अजून नायिकेला कोणी जवळचा मिळाला नाहीये! फुलांनी बहरलेल्या बागेत फिरताना ह्या निसर्गाने माझे जीवनसुद्धा असेच बहरून टाकावे असे मनोगत नायिका व्यक्त करीत राहते. माझ्या हृदयाला धडकणे तुम्हीच शिकवलं आहे आणि त्यामुळे तुम्हांलाच मी दोष देईन! आता माझा अंत पाहू नका, कोणी माझ्या हातात बांगड्या आणून भरा, माझ्या वेणीत गजरा माळा आणि मला सजवून माझ्या नायकाची भेट घडवून द्या अशी आर्जवं ही नायिका करीत आहे. जवळजवळ अर्ध शतक नायक म्हणून वावरलेला देव आनंद आजूबाजूला बागडत असल्याने नायिकेची आपण चिंता करण्याचं काम नाही!!
 

६) दिल तो दिल, दिल का ऐतबार क्या कीजिये 
आ गया तो किसीपे प्यार क्या कीजिये!

हृदयाची तऱ्हाच वेगळी! त्याच्यावर विश्वास कसा ठेवावा! त्याच्यामुळे आपण कोणाच्या प्रेमात पडलो तर आपण काय करू शकणार? बाकी मग पूर्ण गीतभर राखी प्रेमाने झालेली आपली हालत व्यक्त करीत राहते.

७) आप की नज़रों ने समझा प्यार के काबिल मुझे 
दिल की ऐ धड़कन ठहर जा, मिल गयी मंज़िल मुझे!

 इथे आपल्याला प्रियकर भेटल्याने अगदी धन्य झालेली नायिका हे गीत गात आहे. ह्यातील एक ओळ लक्षात राहते 

क्यों तूफ़ानोसे डरु मैं, मेरा साहिल आप हैं 
कोई तूफ़ानोसे कह दे मिल गया साहिल मुझे!

मागच्या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी आप यूँ फासलों से ने सुरु केलेली ही गाण्याची मैफिल यु ट्यूबच्या सूचनांची अधिकच बहरत गेली! पूर्वी विविधभारतीवर ऐकलेली ही गीते यु ट्यूबमुळे प्रत्यक्ष पाहण्याचा आनंद देऊन गेली! धन्य ती लता, जुन्या गायिका आणि धन्य ते पूर्वीचे गीतकार!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भटकंतीचा महिना !

२६ जानेवारी ते २४ फेब्रुवारी ह्या २९ दिवसांत चांगलीच भटकंती झाली. त्यातील बहुतांशी प्रवास कामानिमित्त आणि एक जवळचा प्रवास शालेय स्नेहसंमेलना...