मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, १८ जानेवारी, २०१५

व्यक्ती ते वैचारिक संस्था!!!!



मध्यंतरी एका लग्नाच्या मांडवात एक परिचित व्यक्ती भेटली .  "तू या प्रसंगाला दिसला नाहीस .तु त्या ठिकाणी उशिरा आलास. "  अशी तिने नेहमी प्रमाणे माझी हजेरी घेतली. मी काहीतरी बहाणा काढून वेळ मारून नेली.  
काही वेळानंतर ही व्यक्ती एका घोळक्यात बसली होती. ह्या सर्वजणी मांडवातील जवळजवळ प्रत्येक व्यक्तीचे निरीक्षण करण्यात आणि त्या व्यक्तीवर टिपणी करण्यात गुंतलेल्या होत्या. त्यांचे खास लक्ष नवीन पिढीतील लोकांकडे विशेषतः नुकत्याच संसारात पडलेल्या मुलींकडे होते. उपलब्ध माहिती आधारे त्या ह्या सर्वांविषयीची आपली मते अगदी मोकळ्या मनाने मांडत होत्या.
नंतर मग एक अगदी जवळचे कुटुंबीय भेटले. ते पूर्ण लग्न समारंभात सर्व काही व्यवस्थित चालले आहे की नाही ह्याची खात्री करून घेत होते. हे आमचे कुटुंबीय म्हणजे सर्व माहितीचा, धार्मिक विधीचा ज्ञानकोषच!! ज्ञात असलेल्या सर्व प्रथांना कालानुसार योग्य रूप देऊन त्या प्रथा पाळण्यास समाजातील सर्व व्यक्तींना मदत करण्यास त्यांचा सतत हातभार लागतो. 

१> गावात अशा अनेक व्यक्ती भेटतात, ज्या आयुष्याच्या एका टप्प्यावर एका विशिष्ट विचारसरणीचा पुरस्कार करू लागतात. ही घटना काही एका क्षणात होत नसते. ही जडणघडणीची प्रक्रिया लहानपणापासून चालू असते. आयुष्यात कधीतरी ह्या जडणघडणीच्या प्रगतीचा टप्पा एका विशिष्ट पातळीला पार करतो आणि त्या व्यक्तीला ही विचारसरणी बाह्य जगापुढे मांडण्याचा आत्मविश्वास प्राप्त होतो. छोट्या मोठ्या घटनांमधून मग ह्या व्यक्तीचा आत्मविश्वास बळावू लागतो आणि मग ही व्यक्ती अधिकृतरित्या त्या विचारसरणीची प्रतिनिधी बनते. ही व्यक्ती पारंपारिक वागण्याचा पुरस्कार करणारी संस्था बनली असे आपण म्हणूयात. 

२> उदाहरण १ मध्ये उल्लेखलेली व्यक्ती सार्वजनिक जीवनात संस्था म्हणून वावरण्याइतपत आत्मविश्वास बाळगून असते. पण प्रत्येक वेळा असे होते असं नाही. बहुतेक सर्वच जण आयुष्याच्या एका टप्प्यावर एका विशिष्ट प्रकारे विचार करू लागतात. ह्यातील काही भाग अनुवांशिक घटकातून, काही ज्या भागात तुम्ही वाढलात तिथल्या चालीरितीमधून आलेला असतो. जर तुम्ही समजा एकाच प्रकारच्या वातावरणात कायम राहिलात तर तुमच्या विचारसरणीच्या कक्षा रुंदावत नाहीत. मग तुम्ही थोड्या मर्यादित विभागातील विचारांचे प्रतिनिधित्व करणारी संस्था बनता! पण तुम्ही ह्या विचारसरणीचे अगदी हिरिरीने प्रतिनिधित्व करण्याची शक्यता मात्र जास्त असते. ह्या उलट जर तुम्ही आयुष्यभर जगात वेगवेगळ्या ठिकाणी फिरलात तर तुमच्या अनुवांशिक आणि जन्मभूमिद्वारे तुम्हांला मिळालेला एका विशिष्ट पद्धतीचा वैचारिक वारसा आपली संहती, तीव्रता कोठेतरी गमावून बसतो. तो माणूस आधुनिक विचाराचा म्हणून गणला जात असला तरी त्याला आपण वैचारिक संस्था म्हणू शकत नाही. 

३> तरुण वयात होणारे पती पत्नीचे वाद हे बऱ्याच वेळा त्यांच्या व्यक्तिगत विचारसरणीतील फरकामुळे होत असतात. पण जसजसे वय वाढत जाते तसतसे त्यांचे वैचारिक संस्थामध्ये परिवर्तन होत जाते. मग संघर्ष दोन संस्थामधील मतभेदासारखे वाटू लागतात. 

४> काही व्यक्ती एखाद्या विषयात खोलवर संशोधन करतात. मग त्यांचे त्या विषयाच्या ज्ञानकोषात रुपांतर होते. पण सहसा अशा व्यक्ती शांत राहणे पसंत करीत असल्याने त्यांचं बोलघेवड्या संस्थात रुपांतर होत नाही; बऱ्याच वेळा लिहिणाऱ्या संस्थात रुपांतर होते!

व्यक्तीरुपातील अशा विविध संस्था आपल्या आसपास वावरत असतात. सामाजिक जीवनात वावरताना हल्ली मी व्यक्तींचे निरीक्षण करीत असतो आणि त्यांचं संस्थात रुपांतर झालं आहे का ह्याचा विचार करतो. असंच माझंही कोणीतरी निरीक्षण करीत असणार!

एक गोष्ट मात्र खरी की ह्या व्यक्तीसंस्था आपल्या संस्कृतीचे हस्तांतरण करण्यात मोलाचा वाटा बजावत असतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...