मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, ८ नोव्हेंबर, २०१४

ग्यान, गलका, शिराळा, कसाब


एखा द्या देशाच्या परिस्थितीचा परिणाम त्या देशाच्या नागरिकांच्या मनोस्थितीवर होत असतो. आता आपल्या भारताचेच पहा ना! सर्व प्रसिद्धीमाध्यमांच्या मते आपण प्रगतीच्या वाटेवर कूच करीत आहोत. हे वाचून आपला आत्मविश्वास बळावतो. माझेच उदाहरण घ्या. मी स्वतःला ज्ञानी (ग्यानी म्हटले तर अजून प्रभाव पडतो!) समजू लागतो. ब्लोग लिहून जबरदस्तीने लोकांच्या मेल वर पाठवतो. चार लोक जमले की फंडे देतो. पण -मेल वर ज्ञान देणे आणि प्रत्यक्ष भेटीत ज्ञान देणे यात फरक असतो. -मेल वरील ज्ञान लोक त्यांची खरोखर इच्छा असेल तर वाचतात अथवा बर्याच वेळा -मेलचा नाश करतात. परंतु प्रत्यक्ष भेटीत ज्ञान देताना आपण समोरच्या व्यक्तीचा वेळ घेत असतो. इतकेच नाही तर त्याने आपल्या चेहऱ्यावर अनुकूल हावभाव आणले पाहिजेत अशी आपली अपेक्षा असते.
हल्लीचा जमाना मात्र बदलला आहे. फुकटात कोणी ऐकून घेत नाही. FM रेडिओवर उद्घोषक - मिनिटाच्या गाण्यानंतर १० मिनिटे वायफळ गडबड करतो. त्या वेळी आपण दुसरे स्टेशन लावतो. माझी प्रत्यक्षातील ज्ञानवाणी ऐकून घेणारे फार कमी लोक; बायको, मुलगा आणि कार्यालयातील टीम. कार्यालयातील टीम ही माझी ज्ञानवाणी ऐकण्यासाठी बांधील असते. त्या बैठकीच्या वेळी त्यांना मी बंधक बनवितो. तेथील माझ्या प्रवचनास ग्यान हा अधिक उचित शब्द आहे. ग्यान म्हणजे आपला अधिकार सिद्ध करण्यासाठी वरच्या पदावरील माणसाने उधळलेली मुक्ताफळे!
घरी मात्र परिस्थिती वेगळी असते. लोकशाही भारताच्या कानाकोपर्यात, सर्व वयोगटात पसरली आहे याचा अनुभव मला येतो. बाबा, पुन्हा पुन्हा तेच काय सांगता, मला माहितेय असे का मुलगा बोलला की मी आवरते घेतो. बायकोकडे तर हजार उपाय. प्रवचन चालू असताना अचानक अरे आज भाजी आणावी लागेल, किंवा बिल भरावे लागेल असे लक्ष विचलित करणाऱ्या घोषणा ती करते. मात्र हल्ली सर्वजण सुज्ञ बनले आहेत. माझ्याकडून काही करून घ्यायचे असले की मात्र माझे प्रवचन ऐकून घेतले जाते.
आता आपण प्रवचन का देतो तर मुलाची जडणघडण (अर्थात formatting ) करण्यासाठी. बायको ही formatting च्या पलीकडे असते ही गोष्ट वेगळी. बायको ही आपले formatting करू शकते हे लक्षात असू द्यावे. ती ज्या नवऱ्यास लवकर कळली त्याचा संसार सुखाचा झाला. असो मुलाच्या जडणघडणीचे मार्ग कालौघात बदलले. पाठीवर धपाटा हा पूर्वीचा राजमान्य आणि सर्वात सोपा मार्ग. ह्याद्वारे मुलाला अनेक गोष्टी शिकायला मिळायच्या. इथे चर्चेला वाव नाही, मी इथला अधिकारी व्यक्ती आहे आणि बरेच काही. काळ बदलला, चर्चा करून, मन वळवून निर्णय घेण्याचे, ज्ञान देण्याचे दिवस आले. परंतु कधी कधी ह्याच्याही पुढे जावून प्रत्यक्ष कृतीतून धडा द्यावा लागतो.
आयुष्यात सदैव काही मनासारखे होणारे नाही. सुखानंतर दुःख हे येणारच सगळ्याला तोंड देता यायला पाहिजे, असे ज्ञान आपण सर्व तासनतास देवू शकतो. परंतु आपण हे ज्ञान स्वयंपाकघरातून सुद्धा देवू शकतो. रविवारी ,सुग्रास जेवणावर ताव मारल्यावर सोमवार, मंगळवार मुलावर गलका, शिराळा, पडवळ, दुधी अशा ठेवणीतल्या भाज्यांचा मारा करावा. त्यात मीठ, मसाला कमी टाकावा. जर आपला मुलगा ह्या भाज्या खाऊ शकला तर तो जीवनात कोठेही समाधानाने राहू शकेल. आता बघा मुलाला ह्या भाज्यांच्या महत्त्वाविषयी ग्यान देण्यापेक्षा हा उपाय केव्हाही सोपा, त्यातून एक पुढे आयुष्यात कामास येणारा महत्वाचा उपदेश मुलास मिळतो. वरिष्ठ पदावरील व्यक्ती बोलता सुद्धा कृतीतून आपली वाट लावू शकतो. गलका, शिराळ्याच्या भाजीतून असा काही उपदेश देता येऊ शकतो हे ज्यावेळी मला जाणवले त्यावेळी मी एकदम धन्य झालो. बाकी ह्या भाज्या घेवून ऑफिसच्या कॅन्टीन मध्ये गेल्यास एकच गलका होतो ही गोष्ट वेगळी!
कसाबला भारत देशाचे सर्व नागरिक पोसतात. मला खूप संताप येतो. असाच एकदा मी संतापलो होतो पण मग एक विचार डोक्यात आला. मृत्यूचे भय तर दहशतवाद्यांना नसणारच, पण तुरुंगात खिचपत पडण्याचा विचार त्यांना झेपत असेल का? मानसिक स्थिती झपाट्याने बिघडू शकते. आपले अधिकारी मुद्दाम तर त्याला जिवंत ठेवत नसावेत ना? असो.. तुरुंगात कसाबला गलका, शिराळा, पडवळ, दुधी अशा ठेवणीतल्या भाज्या देवून त्याचे फोटो पेपरात छापले तर?


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भटकंतीचा महिना !

२६ जानेवारी ते २४ फेब्रुवारी ह्या २९ दिवसांत चांगलीच भटकंती झाली. त्यातील बहुतांशी प्रवास कामानिमित्त आणि एक जवळचा प्रवास शालेय स्नेहसंमेलना...