मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, २५ ऑक्टोबर, २०१४

वन नाईट @ द कॉल सेंटर - चेतन भगत



 
मागे चेन्नई एक्प्रेसच्या पहिल्या दिवशीच्या शोला वसईत आगाऊ (म्हणजे ऍडवान्स) बुकिंग न करता आम्ही गेलो होतो आणि त्यावेळी शेवटची का होईना पण तिकिटे मिळाली होती. त्या आठवणीच्या जोरावर काल Happy New Year पाहण्यासाठी ऐन वेळी गेलो पण तिकिटे मिळाली नाहीत. आता मॉलमध्ये आलोच आहोत तर भटकुयात म्हणताना पावलं पुस्तकाच्या दुकानाच्या दिशेने वळली. 
मी सद्यकाळात बऱ्याच जुन्या गोष्टींचा घोष करत असतो असं मला जाणवतं. त्याला अनुसरून कालही मी आधी जुन्या पुस्तकांकडे वळलो. पण अचानक मग नवीन पुस्तकांचा विभाग सुरु झाला आणि मग चेतन भगतची काही पुस्तके दृष्टीस पडली. माझी पुतणी चेतन भगतची मोठी चाहती. तिच्याकडून चेतन भगतविषयीच्या माझ्या ज्ञानात खूप भर पडली आहे. चेतन भगत हा नवीन पिढीचा लाडका लेखक! त्यामुळे त्याच्या पुस्तकाद्वारे नवीन पिढीच्या मानसिकतेमध्ये डोकावून पाहता येईल ह्या विचाराने दोन पुस्तकं विकत घेतली. त्यातलं पहिलं म्हणजे ह्या ब्लॉगपोस्टचे शीर्षक! अजून एक गोष्ट, मी ह्या पुस्तकाचं सुप्रिया वकील ह्यांनी केलेल्या मराठी अनुवादरूप विकत घेतलं. माझं काही खरं नाही मंडळी - गडी अमेरिकन कंपनीत इंग्रजीत दैनंदिन व्यवहार करतो पण त्याला त्या व्यवहारापलीकडे इंग्रजी झेपत नाही!
चेतन भगतच्या पुस्तकांची नावं सुद्धा अगदी खास असतात. अगदी तो IIT मधून शिकल्याचं द्योतक असणारी. आता ही सुद्धा (म्हणजे पुस्तकाची अथवा त्यावर आधारित सिनेमाची नावं) ऐकीव माहितीवर आधारित असल्याने चूकभूल दद्यावी घ्यावी! Three Idiot, Two States, One Night @ the Call Center आणि आता Half Girlfriend!! बहुदा गडी बटाटा पाव किलो, १०० ग्राम अर्थात १ तोळा सोने अशी पुस्तकाची नावे पुढच्या काळात निवडेल की काय असा संशय माझ्या मनात निर्माण झाला आहे.
पुस्तक आहे चांगलं. पण शाळा ह्या पुस्तकानं जसं खिळून ठेवलं तशी जाणीव मात्र निर्माण नाही झाली. कॉल सेंटर मध्ये काम करणारा सहा जणांचा एक ग्रुप. त्यांच्या कार्यालयातील जीवनातील रेखाटलेली एक रात्र. ह्या रात्रीत  अशा काही घटना घडत जातात की त्या सर्वांचं वैयक्तिक जीवन आपल्यासमोर येत. ह्या सहा जणांत दोघांचं आधी जमलेलं प्रकरण सध्या मोडलेलं आहे, अजून दोघं अशी आहेत की मुलाला त्या मुलीत रस आहे पण तिला मात्र मॉडेलिंगमध्ये रस आहे. पाचवी आहे ती विवाहित आहे आणि ज्याच्याशी प्रेमविवाह केला त्याच्याशी जुळवून घेण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे. सहावे वयस्क गृहस्थ आपल्या दूर राहणाऱ्या मुलाच्या संसाराशी संपर्क ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. आणि ह्या सर्वांचा एक अकार्यक्षम असा बॉस आहे जो अनेक छलकपट करून आपली अमेरिकेतील ऑफिसात वर्णी लावायचा प्रयत्न करीत आहे. आणि हो हे कॉल सेंटर व्यवस्थित न चालल्याने ह्या सर्वांवर नोकरी जाण्याची टांगती तलवार आहे. ह्या  सर्व कथानकाला अगदी शेवटी एक कलाटणी मिळते आणि मग …
असो आता पुस्तक विकत घेऊन वाचण्याचा हेतू हा नवीन पिढीची मानसिकता समजावून घेण्याचा असल्याने त्यासंदर्भातील काही भाष्यं!
१> कॉल सेंटर मधील काम करणाऱ्या लोकांना अनुभवावा लागणारा मानसिक संघर्ष! पुस्तकातील प्रत्येक पात्राला स्वतःच्या खऱ्या नावाबरोबर एक अमेरिकन नावसुद्धा आहे. अमेरिकन ग्राहकांशी बोलताना त्या ग्राहकांना आपलेपणा वाटावा म्हणून देण्यात आलेलं! आपल्या स्वत्वचा महत्वपूर्ण भाग असलेलं नावच जर आपल्याला लपवावं लागत असल्यानं जाणवणारी अस्पष्टशी खंत पुस्तकात अदृश्यपणे जाणवत राहते. एका कॉलमध्ये एक ग्राहक फोनवरील माणूस हाअमेरिकन नसून भारतीय असल्याचं ओळखतो आणि त्याच्याशी अपमानास्पद भाषेत बोलतो. व्रुमला हा अपमान सहन न झाल्याने त्याचा तोल जातो.
२> कॉल सेंटर मध्ये काम करणाऱ्या बऱ्याचजणांची सिगारेट, मद्य ह्यावर अवलंबून असण्याची अगतिकता ह्या पुस्तकात जागोजागी आढळून येते.मी सुद्धा हे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं आहे. नैतिकतेच्या घसरणीची अजून काही उदाहरणे मग वाचनात येतात. ते सुद्धा बहुदा खरंच असावं.
३> ह्या ग्रुपमधील जे होऊ घातलेलं प्रेमप्रकरण आहे त्यात मुलगा हा फारसा स्थिरावलेला नाही. कॉल सेंटर मधील त्याची नोकरी तिच्या घरच्यांना फारशी पसंत नाही. तिची आई सतत तिला त्यावरून बोलत राहते. एका क्षणी मग तीही त्याच प्रकारे विचार करू लागते. आणि अमेरिकेत स्थिरावलेल्या एका तरुणाशी लग्नाला तयार होते. हा एक महत्वाचा मुद्दा हल्लीच्या युगात दिसून येतो. मुलींच्या मनात चांगल्या प्रकारे सेटल होण्याची खूप इच्छा असते आणि म्हटलं तर सामाजिक दबाबही असतो. त्यामुळे एक तर स्वतःचे करियर व्यवस्थितपणे करावे किंवा कोण्या व्यवस्थित प्रकारे सेटल झालेल्या माणसाशी लग्न करावे ह्यांचा त्यांच्यावर खूप दबाव पडताना दिसतो. ह्यामुळे बऱ्याचदा लग्न उशिरा करताना किंवा मनाविरुद्ध लग्न करताना दिसतात. अगदी लेखकाच्या भाषेत म्हणायचं झालं तर - "पोरी धोरणी असतात. त्या प्रेम प्रणय वगैरे सगळी फालतू बडबड करतील.. पण ठरविण्याची वेळ आली की सगळ्यांत बडी असामी निवडतील, फैटेस्ट चिकन!"
ह्या उलट अजूनही गावाकडे अगदी साधी माणसं अगदी स्थिरस्थावर न झालेल्या तरुण माणसांशी लग्न करतात. बऱ्याचदा अशी जोडपी आयुष्यभर कदाचित स्थिर होतही नसतील पण आयुष्यात आनंदी राहतात.
४> ३५-१० चा एक नियम मधूनच वाचायला मिळतो. बऱ्याच वेळा ३५ वर्षाच्या ग्राहकाचा मेंदू आणि बुद्ध्यांक १० वर्षाच्या भारतीय मेंदूसारखा असतो. त्यामुळे त्यांच्याशी बोलताना संयम ठेवावा लागतो. ही काहीशी अतिशोयक्ति वाचावयास मिळाली.
५> ह्या सर्वांचा बॉस लबाड आहे. टीममधील सदस्य कोणताही प्रश्न घेऊन त्याच्याकडे आला की व्यवस्थापनाचं एखादं मोठालं तत्व त्याचा संबंध असो कि नसो त्या सदस्याला सांगून त्याची / तिची बोळवण करायची असा त्याचा हातखंडा. MBA वगैरे केलेल्या बोलबच्चन मंडळींचा व्यावसायिक क्षेत्रात असा अनुभव बऱ्याच वेळ असल्याने सतत 'बिग पिक्चर', 'स्ट्रेटेजिक वेरिएबल' वगैरे संज्ञा सतत वापरणाऱ्या आपण ह्या बॉसच्या कॅरक्टरशी बऱ्यापैकी रिलेट होऊ शकतो.  बाकी द्विमितीवर आधारित चार प्रकारचे बॉस आहेत. (अ) ते किती हुशार वा मूर्ख आहेत (ब) ते चांगले कि दुष्ट आहेत. हे मस्तच वर्गीकरण.
६> शेवटी ह्या पुस्तकातील लक्षात राहिलेली काही वाक्ये
  • प्रेमविवाह केलेल्या आपल्या नवऱ्याच्या आईविषयी आणि एकंदरीत घरातील जुन्या वळणाविषयी बोलताना राधिका म्हणते - "माझं अनुजवर प्रेम आहे आणि त्यानं मला सांगितलंय, की हे माझ्यासोबत आलेलं पॅकेज आहे." - ह्यात नवीन पिढीची फक्त आपल्या आवडत्या व्यक्तीशी माणूस म्हणून जुळवून घ्यायची मनोधारणा दिसते. बाकी त्याचे / तिचे सर्व नातेवाईक, घर वगैरे प्रकार पॅकेज म्हणून गणला जाण्याची प्रवृत्ती जास्त!
  • "तू काहीच बोलणार नाहीस?" प्रियांकाने विचारलं. - मुली ज्यावेळी असा प्रश्न विचारतात त्यावेळी खरं तर हा प्रश्न नसतोच. त्यांना तुम्ही काहीतरी बोलायला हवं असतं.
  • बायकांना जखमांची मलमपट्टी करायला फार आवडतं … त्या जखमा फार मोठ्या स्वरूपाच्या नसतात तेव्हा!
  • "कधी चुकूनसुद्धा मला आनंद देवू नकोस," प्रियांकाची आई म्हणाली!
  • कोणत्याही भांडणात जो आधी रडू लागतो त्याला फायदा मिळतो. - लोकांच्या नाटकीय स्वभावा विषयी हे एक मस्त वाक्य!
लेखकानं केवळ योगायोग म्हणून निवडलं की काय ते माहित नाही पण ह्या सहा ही जणांची  वैयक्तिक आयुष्य बऱ्यापैकी अस्थिर! सुखाच्या मृगजळा मागे धावणारी. लेखकाला म्हणायचं नसेल कदाचित, पण माझं मत मात्र असंच की प्रगतीच्या मागे धावून आपण मिळवलं काय? काही लोकांना अशा खूप स्पर्धात्मक जगात यश अगदी निर्विवादपणे  मिळू शकतं, पण बाकीचे सर्वजण तर बऱ्याच गोष्टींचा त्याग करून मगच ह्या दुनियेत येऊ शकतात. प्रश्न असा आहे कि ह्या प्रगतीचं किती मोल आपण वैयक्तिक आयुष्यात द्यायचं ? ह्या दुनियेत साधेपणाने जगण्यासारख्या नोकऱ्या राहिल्याच नाहीत काय? का माझ्यासारख्या लोकांच्या  नजरा तिथवर पोहोचतच नाहीत?

 बाकी पुस्तक मग एका दिवसात वाचून संपलं. तसं शाळाही एका दिवसातच संपलं होतं. दोघातला फरक काय असा विचार करू लागलो. हे पुस्तक एखाद्या मॅकडोनाल्डच्या बर्गरसारखं अथवा पिझ्झा हटच्या पिझ्झासारखं वाटलं; शाळा मात्र भरपेट घरगुती जेवणासारखं वाटलं. जुन्या सवयी सहजासहजी जात नाही हेच खरं!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...